विद्यार्थी गिरवणार स्वच्छतेचे धडे

विद्यार्थी गिरवणार स्वच्छतेचे धडे

Published on

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : एखादी गोष्ट विद्यार्थ्यांना शालेय जीवनात पटवून दिली, तर ती त्याच्या घरापर्यंत सहज पोहोचत असते. शहर स्वच्छतेसाठीदेखील हेच सूत्र वापरण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आता ‘स्वच्छतेची पाठशाळा’ या उपक्रमाद्वारे शाळेतच स्वच्छतेबाबतचे धडे दिले जाणार आहेत.

स्वच्छता आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहे. शहर स्वच्छ राहिले, तर आजारही पळून जातात. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातून देशातील शहरांसाठी दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण आयोजित केले. यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जात असतात. याचाच एक भाग म्हणून महापालिकेने खास शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छतेची पाठशाळा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून शाळेतील शिक्षक दररोजच्या अध्यापनातील काही वेळ विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी देणार आहेत. स्वच्छता राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या, याचे धडे शिक्षक विद्यार्थ्यांना देणार आहेत.

विद्यार्थ्यांनी शाळेत एखादी गोष्ट शिकली, तर ती त्यांना सहज समजते व त्याचा ते आपल्या घरात, दररोजच्या जगण्यासाठी वापर करू लागतात. या विद्यार्थ्यांना शाळेतच शिक्षकांनी स्वच्छतेबाबतची शिकवण दिली, तर त्यांना स्वच्छतेचे महत्त्वही कळेल व ती बाब आपल्या घरातदेखील पालकांनादेखील पटवून देतील. यासाठी महापालिका प्रशासनाने शालेय शिक्षकांसाठी नुकतीच एक कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षकांना स्वच्छतेबाबतच्या सामुदायिक जबाबदारीची जाणीव करून दिली.

महापालिकेचे सफाई कर्मचारी दररोज शहर स्वच्छ करीत असतातच; मात्र प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता राखली, कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण केले व एकल प्लॅस्टिकचा वापर टाळला तर शहर आपोआपच स्वच्छ होईल व त्याच्या सौंदर्यात भर पडेल, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.

शिक्षकांना माहिती
महापालिकेने बिस्लेरी या कंपनीच्या सीएसआर निधीतून प्लॅस्टिकमुक्त शहर अभियान सुरू केले आहे. या कंपनीच्या अधिकारी पूजा शिंदे यांनीदेखील प्लॅस्टिकमुक्त जीवनशैली, प्लॅस्टिकचा पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया यांविषयी माहिती शिक्षकांना दिली.

शाळेत दररोज प्रार्थनेसाठी अथवा अन्य उपक्रमासाठी विद्यार्थी एकत्र जमतात. अशा वेळी शिक्षक त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार आहेत. घरात दररोज निर्माण होणारा ओला, सुका कचरा कसा ओळखायचा, तो स्वतंत्र कसा ठेवायचा, घनकचरा व्यवस्थापनातील आधुनिक पद्धती, एकल प्लॅस्टिकच्या वापराने होणारे पर्यावरणाचे नुकसान याबाबतची माहिती शिक्षकच विद्यार्थ्यांना देणार आहेत. शहरातील काही निवडक शाळांमध्ये स्वत: आयुक्त व अन्य महापालिका अधिकारी जाऊन याची माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत.
- डॉ. सचिन बांगर,
उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com