बदलापुरात सांडपाणी व्यवस्थेचा अभाव
बदलापुरात सांडपाणी व्यवस्थेचा अभाव
उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारले; अहवाल सादर करण्याचे निर्देश
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. १३ : शहरातील एका व्यक्तीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुळगाव- बदलापूर नगरपालिका क्षेत्रात गटार व्यवस्था आणि सांडपाणी सुविधांच्या बाबतीत कोणतीही व्यवस्था नाही. तसेच सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडण्यात येत आहे. याबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत हे अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच बदलापूर नगरपालिकेला उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावत लवकरच या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देशदेखील दिले आहेत.
कुळगाव- बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सांडपाणी प्रक्रियेसाठी (एसटीपी) नसल्याचे एका जनहित याचिकेदरम्यान समोर आले आहे. बदलापूर पश्चिम एरंजाड भागातील भोईर नामक व्यक्तीच्या घराशेजारी बांधकाम व्यावसायिकाने इमारत उभी करून या इमारतीचे सांडपाणी उघड्यावर सोडून दिले. या वेळी आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दुर्गंधीचा त्रास होऊ लागला. यावर आवाज उठवत संबंधित व्यक्तीने बांधकाम व्यावसायिकाला कुळगाव- बदलापूर नगरपालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिलेच कसे, असा प्रश्न उपस्थित करीत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
याचिकेची सुनावणी सुरू असताना कुळगाव- बदलापूर नगरपालिकेकडे शहरातील एकूण सांडपाणी प्रक्रियेसाठी आवश्यक एसटीपी प्लांट नसल्याचे समोर आले. तसेच पालिकेचे सांडपाणी हे चक्क उल्हास नदीत कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. त्यामुळे उल्हास नदी प्रदूषित होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसांत कुळगाव- बदलापूर नगरपालिका परिसराची पाहणी करावी, तसेच पालिका क्षेत्रातील एकूण स्वच्छतेचा आढावा घेण्याचे व एका आठवड्यात यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने दिले आहेत.
पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी यासंदर्भात संपर्क केला असता त्यांनी कुळगाव- बदलापूर नगरपालिका हद्दीत सांडपाणी व गटार व्यवस्थेसाठी ६५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. तसेच भूमिगत गटार योजनेचा दुसरा टप्पा पूर्ण करून घेण्यासाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून त्यासाठी मंजुरी घेतली असून लवकरच या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उल्हास नदी प्रदूषणात पालिकेचा वाटा
बदलापूर शहराला एकूण सद्यस्थितीला ३६ एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. त्यातच २६ एमएलडीचा एसटीपी प्लांट सुरू आहे. त्यापैकी २१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. खासगी एसटीपी प्लांट ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी प्रत्येकी सात एमएलडी पाणी उचलण्याची कुवत आहे. त्यात प्रत्येकी तीन एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित चार एमएलडी पाणी हे कोणतीही रासायनिक प्रक्रिया केल्याशिवाय थेट नदीत सोडले जाते; मात्र यावरदेखील उपाय म्हणून हे पाणी वाहून जात असलेल्या ठिकाणी बंधारे घालण्याची प्रक्रिया पालिकेने केल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन महिन्यांत नवा एसटीपी प्लांट
शहरात सांडपाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी नवा एसटीपी प्लांट येत्या दोन महिन्यांत तयार होत आहे. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण काम करीत असल्याचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले. हा प्लांट सुरू झाल्यानंतर शहरातील संपूर्ण सांडपाण्यावर, प्रक्रिया केली जाईल व ही समस्या सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भुयारी गटार योजना फसली
बदलापूर शहरात २०१४ पासून भूमिगत गटार योजनेच्या कामांना सुरुवात होणार असल्याची चर्चा आणि प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला १५० कोटींचे नियोजन असलेले हे काम पुढे २२५ आणि त्यानंतर ३०० कोटींवर गेले. कुळगाव- बदलापूर नगरपालिकेला भूमिगत गटात योजनेसाठी एमएमआरडीएने कोटींचे कर्ज दिले. आधीच पालिका कर्जात होतीच. पुढे या कर्जात वाढ होत गेली; पण योजना पूर्ण झाली नाही. पुढे भूमिगत गटार योजनेत शहरात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.