खड्ड्यांच्या कचाट्यात भिवंडी

खड्ड्यांच्या कचाट्यात भिवंडी

Published on

खड्ड्यांच्या कचाट्यात भिवंडी
कोंडीमुळे नोकददारवर्ग त्रस्त
भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : शहराच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर मोठ्या संख्येने खड्डे झाले आहेत, तर काही ठिकाणी अर्धवट असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे भिवंडीकरांना येथून प्रवास करताना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे महामार्गांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. जव्हार, पालघर-बोईसर, वाडा, पारोळ, वसई, ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, पडघा, नाशिक यादरम्यानची विविध गावे, शहरातून सुमारे १० हजारांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी आपली नोकरी टिकविण्यासाठी दररोज हलाखीचा प्रवास करीत आहेत.

भिवंडी-कल्याण, भिवंडी-ठाणे (बायपास माणकोली मार्ग), भिवंडी-ठाणे (कशेळीमार्ग), भिवंडी- पडघा-नाशिक (चावींद्रा मार्ग), भिवंडी-वसई (चिंचोटी मार्ग), भिवंडी-पारोळ (शेलारमार्ग), भिवंडी-वाडा (अंबाडीमार्गे) हे भिवंडी शहरातून शहराबाहेर पडण्यासाठी प्रमुख मार्ग आहेत. हे सर्वच मार्ग खड्डेमय स्थितीत असल्याने येथे नियमित वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व मार्गांवर कामे सुरू असल्याने गेल्या काही महिन्यांपासून नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. या सर्व मार्गावरून नियमित नोकरदार आपापल्या कार्यालयात जाण्यासाठी दररोज प्रवास करीत आहेत. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार सुट्टी असते; मात्र खासगी कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदारांना बारा-बारा तास काम करण्यासाठी अनेकांना या समस्यांमुळे दोन ते चार तासांचा प्रवास दररोज करावा लागतो.

वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या खासगी-सरकारी कर्मचाऱ्यांना लेट मार्क मिळतो. त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होतोच. त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थावरही परिणाम होत आहे. तसेच त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातच कार्यालय गाठण्याच्या धावपळीत कर्मचाऱ्यांचे छोटे मोठे अपघातदेखील होतात. याबाबत राजकीय पुढारी, संबंधित शासकीय अधिकारी, ठेकेदार या सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

नोकरदारवर्ग मेटाकुटीला
सार्वजनिक रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी कामाच्या तपशीलाची माहिती देणारे फलकदेखील लावलेले नाही. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार, याची नागरिकांना माहिती मिळत नाही. या सार्वजनिक रस्त्यांच्या कामांसाठी एमएमआरडीए, एमएसआरडीए, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास महामंडळाने दिलेले टोलनाकेदार हे सध्या विविध ठिकाणी कार्यरत आहेत, तर समृद्धी महामार्गासह इतर मोठ्या प्रकल्पाची कामेदेखील भिवंडी ग्रामीणमध्ये सुरू आहेत; मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने भिवंडीकर नागरिक आणि नोकरदारवर्ग मेटाकुटीला आला आहे.

अर्धवट पुलामुळे वाहतुकीवर परिणाम
भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील उप-अभियंता दत्तू गीते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही, तर भिवंडीतील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त शरद ओहोळ यांनी सांगितले की, विविध योजनेतून सुरू झालेल्या रस्त्यांतील वाहतूक ठाण्याच्या मार्गावर वाढली आहे, तर माणकोली पुढील अर्धवट पुलामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. या वाहतुकीला वेळेत पुढे जाण्यासाठी मार्ग नाही. तसेच गोदामाकडे जाणारी वाहने वाहतुकीला अडथळा करतात. त्यामुळे ठाणे मार्गाकडे वाहतूक कोंडी होत आहे. खारेगाव नवीन पूल सुरू झाल्यानंतर ही वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com