पर्यटनामुळे शेती, वाड्यांचे प्रमाण घटले
पर्यटनामुळे शेती, वाड्यांचे प्रमाण घटले
श्रीवर्धनमध्ये हाॅटेल्स, रिसॉर्टची संख्या वाढली
श्रीवर्धन, ता. १६ (वार्ताहर) ः श्रीवर्धनमध्ये मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढीस लागले आहे. त्यातच स्थानिक प्रशासनाकडून समुद्रकिनाऱ्याचे अद्ययावत सुशोभीकरण झाल्याने पर्यटनात आणखी वाढ झाली असून, क्षेत्राला ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे, मात्र यामुळे तालुक्यात शेतीचे प्रमाण घटले आहे. अनेकजण व्यवसायदृष्ट्या पर्यटनाकडे आकर्षित झाल्याने अनेकांनी आपल्या वाड्यादेखील माेडीत काढल्या असून, त्या ठिकाणी पर्यटकांसाठी निवासी खोल्या काढल्या आहेत. त्यामुळे पर्यटन वाढत असताना शेतीकडे येथील तरुणांचे दुर्लक्ष होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची जन्मभूमी तसेच येथील प्राचीन मंदिरे, तीन किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्य या कारणास्तव श्रीवर्धन एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. नारळ, सुपारीच्या वाड्या आणि भातशेती हे ही पर्यटकांसाठी एक आकर्षण आहे. वाढत्या पर्यटनातून स्थानिकांनी आपल्याला ही उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त व्हावे, या उद्देशाने घरातील खोल्यांची दुरुस्ती करून पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, भोजन व नाश्ता आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अनेक बेरोजगार तरुणांच्या हाताला पर्यटन व्यवसायामुळे काम मिळत आहेत. तसेच काही हाॅटेल व्यावसायिक कोकणातील खाद्यपदार्थांच्या ऑर्डर महिला बचत गटांना देत आहेत. त्यामुळे श्रीवर्धन येथील महिला बचत गट ही ऊर्जितावस्थेत आले आहे. पर्यटन व्यवसायातून अनेकांना आर्थिक उत्पन्नाचे स्रोत प्राप्त झाले आहे. पर्यटन व्यवसायात कष्ट कमी व झटपट पैसा मिळतो, हा समज अनेक बागायतदारांना झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये श्रीवर्धन येथील किमान २० टक्के बागायतदारांनी एकरोवारी वाडीतील माड, पोफळी, केळी व बागायती झाडे बुंधा सकट तोडून त्याठिकाणी पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी वातानुकूलित खोल्या, साध्या खोल्या तसेच पर्यटकांच्या मनोरंजनाकरिता स्वतंत्र खेळांचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
....................
भातशेतीकडे दुर्लक्ष
भाताचे कोठार अशी ख्याती असलेल्या श्रीवर्धन येथे भातपीक उत्पादनात घट होऊ लागली आहे. भातशेतीबाबत अनेक तरुण शेतकरी उदासीन दिसून येत आहेत. मुंबई, पुणे येथील उद्योजक श्रीवर्धन येथे तारांकित हाॅटेल्स उभारण्यासाठी जागेच्या शोधात असून, अनेकांनी शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शेती करण्यासाठी खर्च वाढला आहे. त्यातच मजुरांचा तुटवडा जाणवत असून, बी-बियाणे महाग झाली आहेत. त्यामुळे अनेकांनी शेती विकून हॉटेल, रिसोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत श्रीवर्धनमध्ये आता भाताचे उत्पादन घटले असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.