मिरा-भाईंदरमधील रस्ते खड्ड्यांत

मिरा-भाईंदरमधील रस्ते खड्ड्यांत

Published on

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील बहुतांश रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे १० जुलैपर्यंत भरण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, तसेच महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिले होते, मात्र ही मुदत उलटून गेल्यानंतरही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मिरा-भाईंदरच्या हद्दीतून जाणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर-ठाणे महामार्गाचीदेखील वाईट अवस्था झाली आहे.

गेल्या महिनाभरापसून शहरातील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना चालताना त्रास सहन करावा लागत आहेच, शिवाय वाहनचालकांनाही खड्ड्यातून मार्ग कसा काढायचा, असा प्रश्न पडला आहे. अनेक दुचाकी या खड्ड्यांमुळे नादुरुस्त होत आहेत, तसेच अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. मिरा-भाईंदरमधून जात असलेल्या मेट्रो मार्गाखालील रस्त्यांची अवस्था तर सर्वात वाईट आहे. परिणामी गोल्डन नेस्ट ते काशिमिरा मार्गावर गर्दीच्या वेळी कायम वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरही ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असल्याने दहिसर चेकनाका भागात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. घोडबंदर ते ठाणे या रस्त्यावर अवजड वाहनांची सर्वाधिक वाहतूक सुरू असते. या मार्गावरही खड्डे झाल्याने या रस्त्यावर वाहनचालकांना अचानक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

गेल्या महिन्यात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. या बैठकीला महापालिका प्रशासनासह, एमएमआरडीएचे अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांबाबत सरनाईक यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. १० जुलैपर्यंत रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश सरनाईक यांनी एमएमआरडीए व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते, मात्र या आदेशानंतरही महामार्गावर खड्डे कायम आहेत.

दुसरीकडे शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर झालेले खड्डे बुजविण्यासाठी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी तीन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे, तसेच नागरिकांना खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही जाहीर केला होता, मात्र त्यानंतरही शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजलेले नाहीत.

वाहतूक पोलिसांकडून पत्र
रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर भरावेत, असे पत्र पोलिसांच्या वाहतूक शाखेने मिरा-भाईंदर महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना दिले आहे. खड्ड्यांमुळे मोठे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यांमुळे वाहतूक संथ गतीने चालत असल्याने ती सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

महापालिकेकडून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, परंतु पाऊस पडत असल्यामुळे त्यात अडथळा येत आहे. खड्ड्यात भरलेले डांबर पूर्णपणे सुकण्यासाठी किमान सहा तासांचा अवधी आवश्यक आहे. परंतु अधून-मधून पाऊस सुरूच असल्याने डांबरीकरण व्यवस्थित होत नाही. पावसाने उसंत घेतल्यानंतर तातडीने खड्डे बुजवले जातील. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरण व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com