रेल्वे स्थानकांवरील विकासकामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा जनआंदोलन
स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा!
खासदार म्हस्केंचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ ः ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन वेळीच कामे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
आरएलडीएच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी डीपीआर मास्टर प्लॅनच्या माध्यमातून ९५० कोटी रुपयांचा प्रस्ताव २६ मे २०२३ रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठविला आहे. निवडून आल्यापासून या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करीत आहे; मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही, असे म्हस्के यांनी सांगितले. मास्टर प्लॅन पाठवूनसुद्धा दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरू न झाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. बैठकीला डीजीएम के. के. मिश्रा, डीआरएम हरीश मीना, एस. एस. गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाण्याहून ते मुंबईकडे जाणाऱ्या फलाटावर अजून एक पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. हा पादचारी पूल फलाट क्रमांक १ ते फलाट क्रमांक ७ आणि ८ नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल. ते काम तातडीने सुरू करावे. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ५ ते फलाट क्रमांक १०ला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असून, ते तत्काळ मार्गी लावावे. अन्य विकासकामे त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली.
...
समन्वयाच्या अभावामुळे...
सिडको प्रशासनाने नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे, तर रेल्वे प्रवासी सेवा मध्य रेल्वे देत आहे. या दोन्ही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कित्येक वर्षे येथील रेल्वे स्थानकांची सुधारणाच झालेली नाही. आजच्या बैठकीत रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दूरध्वनीद्वारे खासदार नरेश म्हस्के यांनी संभाषण करून देत चर्चा केली. दोन्ही प्राधिकरणांत समन्वय नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. यावर मार्ग न निघाल्यास कायदा हातात घेऊन आंदोलनाचा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिला. यावर दोन्ही अधिकाऱ्यांनी या आठवड्यात संयुक्त बैठक घेऊन प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
...
विविध सूचना
- दिघा रेल्वेस्थानक ते वाशी रेल्वेस्थानकादरम्यानच्या (दिघा, ऐरोली, सानपाडा) स्थानकांतील सोयीसुविधा आणि सुधारणा करा
- दिघा ते ठाणे स्थानकादरम्यानच्या ट्रकच्या अप-डाऊन लाइनवरील वर आणि खाली जाणाऱ्या जुळ्या (फक्त दुचाकी/तीनचाकी वाहनांसाठी) भुयारी मार्गांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. हे भुयारी मार्ग लवकरात लवकर होणे आवश्यक असून, भुयारी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना ट्रॅक ओलांडावा लागत असून, अपघात होत असल्याची गंभीर बाब महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली.
- सानपाडा-जुईनगर रेल्वे पुलाचे काम पुन्हा सुरू करण्याची सूचना केली.
- वाशी ते बेलापूर, तुर्भे ते ऐरोली आणि बामणडोंगरी ते खारकोपर या सर्व रेल्वे स्थानकांवर सुधारणा करणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.