मुरबाड तालुक्याचे पर्यटन बहरात
सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. २० : पावसाळा सुरू होताच मुरबाड तालुक्यातील निसर्गसौंदर्य पुन्हा एकदा पर्यटकांना भुरळ घालू लागले आहे. ठाणे, मुंबई, पुणे या महानगरांमधून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणावर मुरबाडकडे वळत आहेत. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, फेसाळणारे धबधबे, थंडगार वारे, रानपालेभाज्यांची आयुर्वेदिक चव आणि ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व यामुळे मुरबाड तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे.
मुरबाड तालुक्यातील घाट आणि गडांवर पावसाळ्यात मोठी गर्दी होत असताना अपघातांचे प्रमाणही वाढते. काही पर्यटक निष्काळजीपणे वागत असल्याने प्रशासनाने सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक मार्गदर्शकांबरोबरच योग्य पायघोळ, निसर्गाचा आदर आणि स्वच्छतेचे भान ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माळशेज घाट : निसर्गाचा मनोहारी आविष्कार
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माळशेज घाट हे मुरबाड तालुक्यातील प्रमुख आकर्षण ठरते. पावसाळ्यात घाटामध्ये अनेक लहान-मोठे धबधबे कोसळत असतात. घाटातील रस्त्याच्या दुतर्फा हिरवाई, धुके, गार वारा आणि झुळूक यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना स्वर्गसुखाचा अनुभव मिळतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे सनसेट पॉईंट, विश्रांतीगृहे आणि निवास अशा सुविधा विकसित केल्या असून, त्याचा लाभ ऑनलाइन नोंदणीद्वारे घेता येतो.
गणेश लेणी : पुरातन इतिहासाचे दर्शन
रामपूर-सोनावळे गावाजवळ असलेल्या गणेश लेणी परिसरात पावसाळ्यात धबधब्यांचा मनमोहक नजारा दिसतो. सह्याद्रीच्या कड्यांमध्ये वसलेली ही लेणी श्रीगणेशाच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. येथे भव्य कोरीव मंडप असून, ही प्राचीन वाट पर्यटकांना इतिहासाच्या प्रवासात घेऊन जाते. गणेशोत्सवाच्या काळात स्थानिक आदिवासी समाज पारंपरिक नृत्य आणि गीतांच्या माध्यमातून येथील वातावरण भारून टाकतो.
गोरखगड-मच्छिंद्रगड : गिर्यारोहकांसाठी पर्वणी
गिर्यारोहक व निसर्गप्रेमींसाठी गोरखगड आणि मच्छिंद्रगड ही पर्वतशिखरे पर्वणी ठरतात. देहरी व खोपिवली मार्गे या गडांवर पोहोचता येते. सुमारे २१०० फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण सुमारे ३५० पायऱ्या चढून गेल्यावर कोरीव शिल्पे, प्राचीन मंदिर, पाण्याची हौद आणि गडमाथ्यावरील शांतता मनाला प्रसन्नता देते. येथून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते. हे ठिकाण साधक व गिर्यारोहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
नाणेघाट : सातवाहनकाळीन इतिहासाची साक्ष
नाणेघाट हे ठिकाण म्हणजे पुरातन भारताचा वैभवशाली इतिहास सांगणारे जिवंत उदाहरण आहे. सातवाहन राजघराण्याचा जुना व्यापार मार्ग असलेल्या या घाटात शिलालेख, यज्ञांचे उल्लेख सापडतात. येथील रांजण, टाकी आणि कोरीव मंडप इतिहासाची साक्ष देणारा आहे. गिर्यारोहकांसाठी हे ठिकाण एक पर्वणी आहे.
धरणांची शांती, निसर्गाचा साक्षात्कार
शिरवली, वानजाळे आणि बारवी ही धरणस्थळेही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. शांत पाण्याचे किनारे, पक्षी निरीक्षणाची संधी आणि ग्रामीण भागातील पारंपरिक जेवण यामुळे कुटुंबांसाठी पिकनिकसाठी ही उत्तम ठिकाणे ठरत आहेत.
पर्यटकांसाठी सुरक्षिततेसाठी आवाहन
पावसाळा सुरू होताच माळशेज घाट, गणेश लेणी, गोरखगड, नाणेघाट अशा पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. मात्र, काही अति उत्साही पर्यटक स्वतःची सुरक्षितता न बाळगता अपघातांचे बळी ठरतात. त्यामुळे स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी समजून वागणे अत्यावश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.