द्रुतगतीवर २७ लाख चालक बेशिस्त
पनवेल, ता. २१ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गावर वर्षभरापूर्वी इंटेलिजंट ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम (आईटीएमएस) यंत्रणा बसविली. या कालावधीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २७ लाख ७६ हजार वाहनांवर कारवाई झाली असून, ४७० कोटींचा दंड ठोठावण्यात आला. यापैकी ५१ कोटी ३२ लाखांचा दंड वसूल झाला आहे.
द्रुतगती मार्ग सहापदरी असून, ९४.५ किलोमीटर लांबीचा आहे. मुंबई-पुण्याशिवाय साताऱ्यापासून कोकणात आणि पुढे बंगळूरला जाण्यासाठी हा महामार्ग सोयीचा ठरतो. दररोज एक लाखांहून अधिक वाहनांची वर्दळ असून, अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. हे रोखण्यासाठी मार्गावरील महत्त्वाच्या तसेच अपघातप्रवण ५२ ठिकाणी एआयवर आधारित यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात अत्याधुनिक ३३७ कॅमेरे आणि रडारचा समावेश आहे. याशिवाय ‘वेट इन मोशन’ यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. यात वाहन रस्त्यावरून धावत असले तरी त्यात भरलेल्या मालाचे वजन मोजता येते. वाहनांवर निगराणीसाठी लोणावळा येथील कुसगावमध्ये मुख्य नियंत्रण कक्ष (कमांड कंट्रोल सेंटर) उभारण्यात आला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘आरटीओ’चे अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी तैनात आहेत. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड, पुणे आणि पनवेल येथील मोटर वाहन निरीक्षकांमार्फत १८ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येते.
‘आयटीएमएस’ प्रणाली काय?
आयटीएमएस म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचे नियंत्रण होते. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीची नोंद ठेवण्यात येते. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाते. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचता येते. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले असून, हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतात.
सहा महिन्यांत १०० अपघात
अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होऊनही अपघातांची संख्या कमी झालेली नाही. यावर्षी जानेवारी ते जून सहा महिन्यांत द्रुतगती मार्गावर १०० अपघात झाले आहेत. यात ३० प्रवाशांचा मृत्यू, तर ६२ गंभीर आणि ५३ किरकोळ जखमी झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या घटली असली तरी अजूनही अपघातांचे प्रमाण जास्तच असल्याचे दिसून येते.
नियमांच्या उल्लंघनाचे प्रकार
भरधाव वाहन चालविणे ः १२.२१ लाख
‘सीटबेल्ट’ न लावणे (प्रवासी) ः ६.६२ लाख
‘सीटबेल्ट’ न लावणे (चालक) ः २.६३ लाख
चुकीची मार्गिका ः ४.९ लाख
हे नियम मोडल्यास कारवाई
वाहन भरधाव चालविणे
मार्गिका अचानक बदलणे
सीटबेल्ट न लावणे
नो-पार्किंग
चुकीच्या मार्गिकेतून प्रवेश
वाहन चुकीच्या बाजूने चालवणे
बोगद्यात वाहन थांबवणे
क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक
अवजड वाहन उजव्या मार्गिकेतून चालविणे
वाहनांवरील कारवाई
कार -१७,२०,८१६
मालवाहतूक- ५,३३,४४२
बस- २,६७,५२४
कॅब -२,००५८८
कृषिवाहने- ३०,४५०
दुचाकी- १३,८२३
द्रुतगती मार्गावर वाहतूक पोलिस चोवीस तास तैनात असतात. जनजागृतीसह बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. समुपदेशन केंद्रही सुरू केले आहे. वाहनचालकांनी आपल्या कुटुंबीयांचा आणि आपल्या जबाबदारीचा विचार करून सावकाश, नियमांचे पालन करून वाहन चालविणे आवश्यक आहे.
नीलेश धोटे, सहाय्यक अधिकारी, प्रादेशिक परिवहन, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.