शेखाडी पुलाचा संरक्षण कठडा कोसळला
शेखाडी पुलाचा संरक्षण कठडा कोसळला
रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पुलाकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
श्रीवर्धन, ता. २१ (वार्ताहर) ः श्रीवर्धन दिवेआगर मार्गावरील शेखाडी ग्रामपंचायत हद्दीतील पुलाचा संरक्षण कठडा काही कालावधीपूर्वी कोसळला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने शेखाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी पडलेल्या कठड्याच्या जागेवर काठ्या उभ्या करीत साड्या बांधून ठेवल्याने वाहनचालक संभ्रमात पडले आहे, शिवाय अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
श्रीवर्धन तालुका हा समुद्रकिनारा व डोंगराळ भागाने व्यापला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी डोंगरावरून खाली येणारे पावसाचे पाणी समुद्राच्या, खाडीच्या दिशेने जावे याकरिता पूल व साकव बांधले आहेत. डोंगरावरून खाली येणारा पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने पुलाची बांधणी मजबूत तसेच पाण्याचा विसर्ग होण्यासाठी दगडी खांबाद्वारे पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. शेखाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १० मीटर लांबीचा व चार मीटर रुंदीचा सहा सिमेंट पाइपद्वारे पूल बांधण्यात आला आहे. हा पूल वाहतूक व रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पुलापासून काही अंतरावर जिल्हा परिषद शाळा आहे. एका बाजूला डोंगर असल्याने पावसाळ्यातील पाणी याच पुलाखालून समुद्राकडे जाते. पुलापासून साधारणतः २५ ते ३० मीटर अंतरावर समुद्रकिनारा आहे. पावसाळी दिवसात अनेक वेळा उधाणाचे पाणी याच पुलाखालून वाहून पलीकडील शेतात जाते. काही कालावधीपूर्वी पुलाचे दोन्ही बाजूंचे कठडे कोसळले होते. अरुंद पूल त्यातच कठडे नसल्याने मध्यंतरी दोन मिनीडोअर तसेच पर्यटकांचे वाहन पुलावरून खाली पडले होते; परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. पावसाळी दिवसात डोंगरावरून वेगाने पुलाखालून समुद्राकडे वाहत जाणारे पाणी, त्याचप्रमाणे समुद्राच्या उधाणाचे पाणी पुलाखालून विरुद्ध दिशेला जात असल्याने शालेय विद्यार्थी, वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
...................
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही संरक्षण कठडा उभारण्यात न आल्याने शेखाडी येथील ग्रामस्थ विशेषतः महिलांनी त्याच जागी काठ्या उभ्या करीत साड्या बांधून ठेवल्या आहेत. जेणेकरून विद्यार्थी, पर्यटकांना पुढे कठडे नसलेला पूल आहे, याची जाणीव व्हावी व त्या अनुषंगाने जीवाला धोका निर्माण होऊ नये, असे शेखाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बबन पाटील यांनी सांगितले. तसेच आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नवीन पुलाची मागणी केली आहे, तात्पुरते संरक्षण कठडे उभे करावेत, अशी आमची मागणी असल्याचे पाटील यांनी सांगितले.
.........................
सद्यःस्थितीत पुलाच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच अर्थसंकल्पामध्ये नवीन पूल बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येत आहे; मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- तुषार लुंगे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीवर्धन
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.