राजेवाडीतील दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
राजेवाडीतील दोघांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
सरकारी यंत्रणेचे वरातीमागून घोडे; गावात अनेक ठिकाणी फक्त सूचनाफलक
जव्हार, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राजेवाडीत गॅस्ट्रोने दोन आदिवासी नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना घडल्यामुळे पालघर जिल्हा प्रशासन मात्र वरातीमागून घोडे नाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. गावात विविध ठिकाणी सूचनाफलक, विहिरींवर जाळ्या, येथे कचरा टाकू नये, यांसारख्या पाट्या, घरावर ‘या विहिरीचे पाणी पिऊ नका’च्या नोटीस लावण्याचे प्रकार फक्त चालू आहेत.
पाणीपुरवठा, आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागाकडून त्या गावामध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. या सर्व गोष्टी मॉन्सूनपूर्व तयारीमध्ये केल्या जातात; मात्र आता दोघांचा जीव गेल्यानंतर या यंत्रणा जाग्या झाल्या आहेत.
नांदगाव ग्रामपंचायतीमधील राजेवाडी गावात खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी नुकतीच या ठिकाणी भेट दिली आहे. त्यानंतर संबंधितांना आणि ग्रामस्थांशी चर्चा करून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. गॅस्ट्रोने मृत्यू झालेल्या दोघांची जबाबदारी आता कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे; मात्र या वेळी या दोन जीवांचे पाप कोणाचे, याची जबादारी कोणाची, हे अजूनही निश्चित झालेले नाही.
----------------------------
पुरवठा बंद का?
गावामध्ये काट्याची विहीर आणि चाफ्याची विहीर अशा दोन विहिरी आहेत. या दोन्ही विहिरींतील पाणीपुरवठा करणारी जुनी योजना येथे आहे. उन्हाळ्यात दोन्ही विहिरींतील पाणी सोडले जाते; मात्र दर पावसाळ्यात ही पाणीपुरवठा योजना बंद केली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
--------------------------------
दूषित पाणी
काट्याच्या विहिरीला पाण्याचा स्रोत नसल्याने पावसाळ्यातील झिरपणाऱ्या पाण्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होते आणि याच पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ येऊन दोघांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. तर, दुसरीकडे गावात आता २४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे घडलेल्या घटनेला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत.
-------------------------------
नागरिकांसाठी आम्ही सर्व शुद्ध पाणी देण्याबाबतच्या उपाययोजना तातडीने करीत आहोत. ज्यांना त्रास असेल त्यांनी पूर्ण उपचार घ्या, घरी जाण्याची घाई करू नका.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर
-----------------------------
मी या दोन्ही विहिरींची पाहणी केली असून परिस्थिती अतिशय वाईट आहे. पिण्याचे शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे आदिवासीबांधवांचा मृत्यू होत असेल तर दुर्दैवी आहे.
- प्रकाश निकम,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, पालघर
-------------------------------
गावामध्ये पाच दिवसांनंतरही एक लहान मुलगा गॅस्ट्रोसदृश आढळून आल्याची बाब गंभीर आहे. सर्व घरांचा सर्व्हे करून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. हेमंत सवरा,
खासदार, पालघर लोकसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.