धावपट्टीवरून एअर इंडियाचे विमान घसरले
धावपट्टीवरून एअर इंडियाचे विमान घसरले
तीन चाकांचा स्फोट; मुसळधार पावसात नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : कोचीहून मुंबईकडे येणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान (एआय- २७४४) सोमवारी (ता. २१) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले. या अपघातात विमानाच्या तीन चाकांचा स्फोट झाला असून इंजिनचेही नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
एआय- २७४४ हे एअर इंडियाचे एअरबस ए-३२० (व्हीटी-टीव्हीवायए) विमान कोचीहून मुंबईला येत होते. हे विमान सोमवारी सकाळी ९.२७ वाजता धावपट्टी क्रमांक ०९/२७ वर उतरत असताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरले. धावपट्टीवरून थोडेफार बाजूला गेल्यानंतर मोठा आवाज होऊन या विमानाच्या तीन टायरचा स्फोट झाला, यामध्ये इंजिनलाही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे; मात्र वैमानिकाची प्रसंगावधान राखत विमान प्रवेशद्वारापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवले. या अपघातामध्ये सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप आहेत. या घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे रनवे ०९/२७ चे काहीसे नुकसान झाले असून तत्काळ दुसऱ्या धावपट्टीवरून (१४/३२) विमानांची वाहतूक वळवण्यात आली आहे.
अधिकृत निवेदन जारी
एअर इंडियाकडून या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे रनवे निसरडा झाल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘वैमानिकाच्या सजगतेमुळे मोठा अनर्थ टळला. प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विमानतळ प्रशासन आणि एअर इंडियाकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.