बाजार समिती भोवताली बेकायदेशीर दुहेरी वाहन पार्किंगः अपघातांना आमंत्रण

बाजार समिती भोवताली बेकायदेशीर दुहेरी वाहन पार्किंगः अपघातांना आमंत्रण

Published on

बाजार समितीभोवती बेकायदा दुहेरी पार्किंग
अपघातांना मिळतेय निमंत्रण
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत वाहनतळाच्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रहिवासी इमारती उभारण्यात आल्या आहेत. इतर ठिकाणी असलेले बेकायदा वाहनतळ बंद झाले आहे. त्यामुळे बाजार आवारात वाहनांना पार्किंगसाठी जागा मिळत नाही. परिणामी, ही वाहने आता बाजार समितीच्या सभोवताली दुहेरी पार्किंग केली जात आहे. परिणामी, इतर वाहतुकीला अडथळा येत आहे. शिवाय, संपूर्ण रस्त्यातील ही दुहेरी पार्किंग अपघातांना आमंत्रण देत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच बाजार आवारात दररोज वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात अनेक वाहने दोन ते तीन दिवसांचा प्रवास करून परराज्यातून आलेली असतात. त्यामुळे ही वाहने किमान एक दिवस तरी बाजार आवारात थांबतात. त्यासाठी बाजार समितीच्या उभारणीच्या वेळीच या ठिकाणी मसाला बाजाराच्या विरुद्ध दिशेला प्रशस्त असे वाहनतळ उभारण्यात आले होते; मात्र ही जागा पंतप्रधान आवास योजनेत गेली आणि आता या ठिकाणी रहिवासी संकुल उभारले आहे. त्यानंतर एका व्यापारी भूखंडावर बेकायदा वाहनतळ सुरू झाले; मात्र या भूखंडावर दोन महिन्यांपूर्वी सिडकोने कारवाई केल्याने हेही वाहनतळ बंद झाले. फळ बाजाराच्या समोर असलेल्या भूखंडावर ही वाहने पार्क केली जात होती; परंतु मागील आठवड्यात या ठिकाणच्या आगीत आठ ट्रक जळून खाक झाले.
परिणामी, आता ट्रक, टेम्पो यांना पार्किंगसाठी हक्काची जागा राहिली नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंग सुरू केली आहे. पहिल्यांदा ही पार्किंग एकेरी होती; मात्र आता ती दुहेरी झाली आहे. यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रस्ता या पार्किंगमध्येच व्यापला जात आहे. त्यामुळे नियमित वाहतुकीला आता अडथळा येऊ लागला आहे. वाहने चालवताना वाहनचालकांना सांभाळून चालवावी लागत आहेत.

पथदिवे बंद
या रस्त्यांवर बऱ्याच ठिकाणी पथदिवे बंद आहेत, त्यामुळे गाडी उभी आहे की पार्क केली आहे, याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. परिणामी, वारंवार या ठिकाणी लहान-मोठे अपघात होत आहेत. मागील आठवड्यात रात्री याठिकाणी पार्क केलेल्या ट्रकला मागून रिक्षांची धडक बसली. असे अपघात या ठिकाणी नेहमीच होत आहेत. त्यामुळे बाजारात येणाऱ्या वाहनांना वाहनतळाची जागा द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोट
वाहतूक विभागाकडून दैनंदिन कारवाई केली जाते. तसेच, वाहतूक कोंडी झाल्यास त्वरित वाहतूक कोंडी सोडवली जाते.
- शिवाजी भांडवलकर, वाहतूक पोलिस निरीक्षक, एपीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com