‘आदर्श रस्ते’ इतिहासजमा

‘आदर्श रस्ते’ इतिहासजमा

Published on

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २३ : एकेकाळी ''आदर्श रस्त्यांचे शहर'' म्हणून गौरवलेले उल्हासनगर आज पावसाळ्यात खड्ड्यांत गेल्याने ती ओळख हरवत आहे. विशेषतः हिराघाट चौक शहराचा प्रमुख, वर्दळीचा व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा परिसर आज अक्षरशः खड्ड्यांत हरवलेला आहे.
पप्पू कलानी यांच्या १९८६ ते १९९२ या कारकिर्दीत शहरात १०८ सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळे उभे राहिले होते. त्यात रिंगरोड, मोठे रस्ते आणि लहान रस्त्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील पहिले काँक्रीट रस्ते म्हणून उल्हासनगरकडे पाहिले जात होते. या रस्त्यांची नोंद घेत इतर शहरांनी त्याचे अनुकरणही केले. स्वतः गणेश नाईक यांनीही २०१४ मध्ये याची कबुली दिली होती. मात्र, काही वर्षांत स्थिती झपाट्याने बदलली. नव्याने तयार होणारे रस्ते टिकावू नसून पावसात उखडत आहेत. याउलट पप्पू कलानी यांच्या काळातील रस्ते आजही टिकून आहेत. महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जाहीर करते; पण प्रत्यक्ष कामे पावसाळ्याच्या तोंडावरच सुरू होतात. त्यामुळे रस्त्यांची स्थिती बिघडते आणि वाहनधारक त्रस्त होतात. याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांकडून ओरडही होते; पण निविदा प्रक्रिया हे कारण नेहमीच पुढे करण्यात येते.

हिराघाट चौक खड्ड्यांत हरवला!
यंदाच्या पावसाने मात्र रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते असे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हिराघाट हा नेहमीच वर्दळीचा असलेला चौक खड्ड्यात हरवून गेला आहे. हा चौक श्रद्धेचे ठिकाण असून, बाजूला थायरासिंह दरबार आहे. या दरबारात नेहमीच गोरगरिबांसाठी जेवणाचा लंगर भरवण्यात येत असतो. शिवरात्रीच्या वेळी जत्रा ही भरते. थोड्याशा अंतरावर बोटक्लबमध्ये छट पूजेचा धार्मिक कार्यक्रम होतो. हा चौक पूर्व व पश्चिमेला जोडणारा असतानाही तो संपूर्णपणे काँक्रीटचा का करण्यात येत नाही? असा सवाल वाहनचालक करू लागले आहेत.

२००३ मध्ये १४ अधिकारी, आता केवळ एक
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात २००३ मध्ये १४ अधिकारी कार्यरत होते. अधिकाऱ्यांच्या संख्येमुळे विकासकामांना सातत्याने गती मिळत होती. कालांतराने १३ जण सेवानिवृत्त झाले आहेत. त्यात नऊ वर्षे सेवानिवृत्तीला बाकी असताना आईवडिलांची प्रकृती बरी नसल्याने अनुभवी कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या विभागाची बाजू लंगडी झाली. शहर अभियंता तसेच कार्यकारी अभियंता नीलेश शिरसाठे या एकमेव अधिकाऱ्याच्या खांद्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी येऊन ठेपली आहे. शिरसाठे यांचा भार कमी करण्यासाठी संदीप जाधव यांनी कमबॅक करावे, अशी मागणी केली जात आहे.

दुरुस्तीसाठी पावसाच्या उसंतीची वाट
रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असली तरी महापालिकेकडून वेळेवर उपाययोजना होत नाहीत. खड्डे बुजवण्याच्या कामांसाठी पावसाच्या उसंतीची वाट पाहावी लागते. उपायुक्त विशाखा मोटघरे यांनी सांगितले की, पावसाने उसंत घेताच हिराघाट चौकासह इतर चौक व मुख्य रस्त्यांची कामे सुरू केली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com