१२ ऐवजी सातच उड्डाणपूल
वसई, ता. २४ (बातमीदार) : एकीकडे शहरातील नागरिक वाहतूक कोंडीने ग्रासले आहेत, अशातच पर्यायी मार्गासाठी वसईतून थेट सरकारकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे. प्रवासासाठी एकच रस्ता सलग असल्याने दोनऐवजी एकाच मोठ्या उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे १२ ऐवजी सात उड्डाणपुले उभारण्यात येणार आहेत. परिणामी शहरातील कोंडीचे संकट दूर होण्यासाठी मदत होणार आहे.
वसई-विरार शहरात नागरीकरण झपाट्याने वाढू लागले आहे. त्याच प्रवासी वाहतूक, तसेच खासगी वाहनांमध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. वाहतुकीला रस्ते अपुरे पडू लागले आहेत. वसई पश्चिम येथील एक पूल नादुरुस्त असल्याने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे, तर नालासोपारा व विरार येथे प्रत्येकी एक पूल आहे, परंतु या पुलांवर वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. अत्यावश्यक सेवांसह सर्वसामान्य प्रवासी, अन्य वाहनांना त्रास सहन करावा लागतो. जरी फेरीबोट सेवा सुरू केली असली तरी ती तालुक्याच्या बाहेर जाण्यासाठी सोईस्कर आहे, मात्र शहरांतर्गत प्रवास करणाऱ्यासाठी पर्यायी मार्ग अपुरे आहेत. त्यामुळे तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथे नारंगी उड्डाणपुलाची मागणी केली. हा पूल तयारदेखील झाला आहे. तो रहदारीसाठी लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. याचबरोबर ठाकूर यांनी शहरात उड्डाणपूल निर्मितीसाठी सरकारकडे निधीसाठी मागणी केली होती.
सद्य:स्थितीत होणारी कोंडी आणि त्यातून करावा लागणारा प्रवास पाहता नागरिकांचा मनस्ताप होत आहे. २०२४ मध्ये एकूण १२ पुलांचा प्रस्ताव होता, मात्र आता एकाच मार्गावर दोन पुलाऐवजी एकच मोठा उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. १० वर्षांपूर्वीदेखील यासंदर्भात पहिला प्रस्ताव महापालिकेने सादर केला होता. त्याचे सर्वेक्षण झाले तरी कामाची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वाहतुकीची समस्या जैसे थे राहिली. एकीकडे हा पाठपुरावा केला असला तरी निधीअभावी काम रखडले गेले होते. आता या कामांना गती देण्यासाठी एमएमआरडीएला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता तरी या पुलांचा मार्ग मोकळा होणार की कोंडी होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
वसई-विरार शहराची कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार एमएमआरडीएला मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या असून, सात उड्डाणपूल तयार होणार आहे.
- स्नेहा दुबे-पंडित, आमदार
एकमेकांना जोडले जाणारे उड्डाणपूल
- विरार खारोडी नाका ते सायन्स गार्डन
- मनवेल पाडा ते फुलपाडा
- माणिकपूर ते बाभोळा
स्वतंत्र उड्डाणपूल
- पाटणकर नाका ते लक्ष्मी शॉपिंग सेंटर मार्ग
- नालासोपारा पूर्व चंदन नाका गोखिवरे रेंजऑफिस मार्ग
- वसंतनगरी
- माणिकपूर ते बाभोळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.