
रेल्वेस्थानकात प्रवाशांना जलाभिषेक
पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या छताला गळती
बदलापूर, ता. २६ (बातमीदार) ः बदलापूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांना पुन्हा एकदा मूलभूत सुविधांच्या अभावाचा फटका बसला. शुक्रवारी (ता. २५) रात्री कोयना एक्स्प्रेसचे इंजिन बदलापूर स्थानकात बंद पडल्याने कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल सेवा खोळंबली होती. एक्स्प्रेसच्या मागे थांबलेल्या लोकलमधून प्रवाशांना उतरून रेल्वे रुळांवरून चालत स्थानक गाठण्याची वेळ आली. या गोंधळातच मुंबईकडील दिशेला असलेल्या पादचारी पुलाच्या छताला गळती लागल्याचे दिसून आले. पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पावसाचे पाणी धबधब्यासारखे कोसळत होते. परिणामी, प्रवाशांना छत्री उघडूनच पूल ओलांडावा लागत होता.
बदलापूर स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम २०१८-१९ पासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, स्थानकावर छप्पर, शौचालय, बसण्यासाठी आसने, पर्याप्त तिकीट खिडक्या यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यातच पादचारी पुलाच्या छताची गळती ही नव्या समस्येची भर ठरत आहे. त्यातच वाढीव रेल्वेफेऱ्या नसल्याने गेली सहा ते सात वर्षे बदलापूरकर सहन करीत आहेत; मात्र किमान मूलभूत सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा बदलापूरकर करीत आहेत; मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने बदलापूरकरांच्या या छोट्या समस्यांकडेदेखील दुर्लक्ष केले आहे. बदलापूर पूर्व व पश्चिम दिशेला उतरणाऱ्या जिन्यांवर दिवे नाहीत, त्यातच आता मुंबईकडील दिशेला असणाऱ्या आणि सर्वाधिक जास्त वापरात असलेल्या रेल्वे पादचारी पुलाचे छप्पर गळायला लागले आहे. पावसाचे पाणी थेट पुलावर कोसळत आहे, त्यामुळे बदलापूरकरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेकडून सापत्न वागणूक
सकाळी ऐन गर्दीच्या वेळी, ट्रेन पकडण्याच्या घाईत हातात छत्री घेऊन पुलावरून ये-जा करावी लागत आहे. बदलापूर शहरातून दिवसाला दीड लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यातून रेल्वेला कोट्यवधींचा महसूलदेखील मिळतो; मात्र असे असतानादेखील, बदलापूर शहराला मध्य रेल्वेकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार बदलापूरचे रेल्वे प्रवासी करीत आहेत.
रात्री एक्स्प्रेस बंद पडल्याने, कामावरून घरी येताना आधीच खूप हाल झाले. त्यात पलीकडे जाण्यासाठी पुलावर चढलो तर, पुलाच्या छताला गळती लागली होती. धबधब्यासारखे पाणी पुलावर पडत होते. रेल्वे रूळ ओलांडू नका म्हणून पुलाचा वापर करण्याचा संदेश देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने निदान रेल्वे पुलाची तरी चांगली व्यवस्था करून द्यावी. रेल्वे प्रवाशांनी नियम पाळावे, अशी रेल्वे प्रशासनाची इच्छा असेल तर, रेल्वे प्रशासनानेदेखील प्रवाशांसाठी सुरक्षित सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या.
- विजय पिल्ले, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.