नव्या पुलामुळे कोंडीचे नवे संकट
नव्या पुलामुळे कोंडीचे नवे संकट
मुंबई, ता. २९ : पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वेस्थानकाजवळ नव्याने बांधलेला उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला होऊन दीड महिना उलटून गेला आहे. या उड्डाणपुलामुळे स्थानिकांना दिलासा मिळण्याऐवजी पुलाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधन वाचण्याऐवजी त्याचा अपव्यय होत आहे. या पुलाच्या तीन मार्गिका केल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. पूर्व आणि पश्चिम भागात दररोज होणारी वाहतूक कोंडी हाताळताना पोलिसांची दमछाक होत आहे. नव्या पुलामुळे विक्रोळीत वाहतूक कोंडीच्या नव्या संकटाशी नागरिकांना सामना करावा लागत आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता हा पूल खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला दिले होते. त्यानुसार १४ जूनपासून पूल खुला करण्यात आला.
१. नवा पूल विकोळी पूर्वेस पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडला जातो आणि विक्रोळीच्या पश्चिम भागाला लालबहादूर शास्त्री मार्गाला जोडला जातो. वाहनांना पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्यासाठी किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी तब्बल एक तास लागत होता. त्यामुळे नव्या पूलांमुळे प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटे इतकी वेळेची आणि इंधननाची बचत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला होता, परंतु नियोजन फसल्यामुळे दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहतूक कोंडीत वाहनचालकांचा वेळ वाया जात असून, इंधनाचीही नासाडी होत आहे.
२. विक्रोळी रेल्वेस्थानकात फाटक ओलांडताना पादचाऱ्यांचे अपघात होत होते. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती; मात्र नव्या पुलावरून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना जाण्या-येण्यासाठी टॅक्सी किंवा रिक्षाशिवाय पर्याय नाही. हा भुर्दंड असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
----
तीन मार्गिकांमुळे गोंधळ
पुलाचे नियोजन करताना दोन किंवा चार मार्गिका असायला हव्या होत्या; मात्र तीन मार्गिका केल्यामुळे या पुलावरील वाहतुकीचा गोंधळ उडत आहे. पोलिसांना सकाळ आणि संध्याकाळी जशी वाहतूक वाढेल, तसे बॅरिकेड्स बदलावे लागत आहेत. त्यामुळे पोलिसांची दररोज तारांबळ उडत आहे.
---
कोणीही जबाबदारी घेत नाही
पुलाच्या त्रुटीबाबत कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारले असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
पुलाच्या खर्चाचा तपशील
२०१८ - ३७ कोटी
२०२२ - ८८.४५ कोटी
२०२३ - ९७.३७ कोटी
एप्रिल २०२५ - १०४ कोटी
जून २०२५ - १०५ कोटी
---
पुलाची एकूण रुंदी १२ मीटर, तर लांबी ६१५ मीटर इतकी आहे.
–
पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ
पुलाच्या दोन्ही बाजूला दररोज होत असलेली वाहतूक कोंडी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे. दोन्ही बाजूला आळीपाळीने पोलिसांच्या तुकड्या तैनात कराव्या लागत आहेत. पूर्वेकडे सकाळ, संध्याकाळ होत असलेली वाहतूक कोंडी आणि पश्चिमेकडील बाजूने होत असलेली वाहतूक कोंडी दूर करताना आमचे हाल होत असल्याचे पोलिस सांगत आहेत.
--
विक्रोळी पूर्व भागातील लोकांना पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी या पुलाचा उपयोग होत आहे, बाकी काही नाही, उलट वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. नागरिकांना नाहक रिक्षा भाडे जास्त द्यावे लागत आहे. एक किलोमीटर अंतरासाठी २६ रुपयाऐवजी वाहतूक कोंडीमुळे ४० ते ५० रुपये मोजावे लागत आहेत.
- ॲड. सुशांत राजे पाटील, स्थानिक
--
नवीन पूल सुरू झाला, मात्र या पुलाचा आम्हाला उपयोग होईल, असे वाटले, पण तसे झाले नाही. वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. वाहनातून नागरिकांना वेळेवर पोहोचता येत नाही.
- रामदेव प्रजापती, रिक्षाचालक
---
पुलाच्या दोन्ही बाजूला कोंडी होत असल्याने वाहनांना आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. नागरिकांचा वेळ आणि पैसाही वाया जात आहे.
-सुरेश जाधव, स्थानिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.