२७ गावातील कामगारांना १५ ऑगस्टला नियुक्तीपत्र
२७ गावांतील कामगारांना १५ ऑगस्टला नियुक्तिपत्र
आयुक्तांचे आमदार राजेश मोरे यांना आश्वासन
कल्याण, ता. ३१ ( वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांतील कामगार मागील १० वर्षांपासून पालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत. या कामगारांना कायम करण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले आहेत; मात्र तरीही या कामगारांची प्रतीक्षा कायम असून, प्रशासनाकडून कामगारांची पोलिस पडताळणी आणि आरोग्य तपासणी पूर्ण होताच या कामगारांना टप्प्याटप्प्याने नियुक्तिपत्र दिली जातील. पहिल्या टप्प्यातील नियुक्तिपत्र १५ ऑगस्ट रोजी देणार असल्याचे आश्वासन पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आमदार राजेश मोरे यांना दिले. गुरुवारी (ता. ३१) आमदार मोरे यांनी विविध विषयांवर पालिका आयुक्तांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली.
ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या गावातून शाळेच्या वेळामध्ये बस सुविधा सुरू करण्याची मागणी मान्य केली. कामगार आणि बस कमी असल्या तरीही काही प्रमाणात या मार्गावर बस चालविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले, तर ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच स्मार्ट सिटीमधील बंद असलेले कॅमेरे सुरु करावेत, गावामध्ये पथदिवे बसवावेत. बाळासाहेब ठाकरे दवाखाने आणि हेल्थ सेंटर सुरू करावेत, सणाचा पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, मंडपांसह कमानी शुल्कदेखील माफ करावे, ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अमृतच्या जलकुंभाचे काम पूर्ण करत या जलकुंभातून पाणी पुरवठा सुरु करावा, ग्रामीण भागातील भुयारी गटारांची कामे सुरू करावीत, डोंबिवली स्थानक परिसरातील चिमणी गल्लीतील पार्किंग तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली.
अधिकाऱ्यासोबत बैठक घेणार
दरम्यान, याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी आमदारांना दिले. त्याचबरोबर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. या वेळी डोंबिवली शहर सचिव विधानसभाक्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, उपतालुकाप्रमुख राहुल गणपुले, उपशहरप्रमुख संजय विचारे, दत्ता वझे, गजानन मांगळूरकर उपस्थित होते.