भगव्याला कलंकित करणाऱ्यांना 
देश माफ करणार नाही!

भगव्याला कलंकित करणाऱ्यांना देश माफ करणार नाही!

Published on

भगव्याला कलंकित करणाऱ्यांना
देश माफ करणार नाही!

न्यायालयासमोर साध्वी प्रज्ञासिंह यांनी व्यक्त केल्या भावना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : भगव्याला आणि हिंदुत्ववादाला कलंकित करणाऱ्यांना देश कधीच माफ करणार नाही, अशी भावना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गुरुवारी (ता. ३१) निकालानंतर न्यायालयासमोर व्यक्त केली. या निकालाने १७ वर्षांत मी पहिल्यांदाच आनंदी झाले; पण मला, भगव्याला दहशतवादी ठरवण्यात आले. माझा छळ करण्यात आला. अखेर आज मला, भगव्याला आणि हिंदुत्वाला न्याय मिळाला. हा हिंदुत्वाचा विजय आहे, अशी भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

स्फोटानंतर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी गेले; पण मलाच दहशतवादी ठरवून अटक करण्यात आली. पहिल्या १३ दिवसांत कोठडीत माझा अतोनात छळ झाला. माझे आयुष्य उद्‌ध्वस्त केले. १७ वर्षांत अपमान, लोकांच्या असह्य नजरा सहन कराव्या लागल्या. केवळ संन्याशी असल्यानेच आपण जगू शकलो. १७ वर्षांचा काळ हा संघर्षाचा होता, अशीही भावना साध्वी यांनी न्यायालयात व्‍यक्त केली.
---------
पुन्हा देशसेवा करणार : ले. कर्नल प्रसाद पुरोहित
कोणाविरुद्ध बोलण्यात आपल्याला स्वारस्य नाही. जे घडले त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. न्यायालयाच्या निर्णयामुळे मी समाधानी आहे. राष्ट्राने माझ्याकडून सेवा करून घेतली आणि मला पुन्हा तशीच देशासेवा करता येईल याचा आनंद आहे, अशी भावना ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी निकालानंतर व्यक्त केली. मी न्यायव्यवस्थेचे, देशाचे आणि माझ्यामागे उभ्या राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो. हे प्रकरण न्यायव्यवस्थेने नीट समजून घेतले आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. या संपूर्ण लढाईत माझे कुटुंबीय, मित्र आणि सशस्त्र दल माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिले. या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत, असेही पुरोहित यांनी सांगितले.
---------------
कुटुंबीयांनाही दहशतवादी ठरवले : रमेश उपाध्याय
याप्रकरणी कोणत्याही पुराव्याविना आपल्याला गोवण्यात आले. कोठडीत असताना शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. नाशिकमध्ये आमची नार्को चाचणी केल्यानंतरच या स्फोटामागे आपला कोणताही सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले होते. तसे असतानाही यामध्ये गोवण्यात आले. माझ्यासह कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्यात आले. बायको, मुलगी यांनाही दहशतवादी ठरवले याची भरपाई कोण करणार, अशा भावना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर रमेश उपाध्याय यांनी व्यक्त केल्या.
-------------------
हा माझा पुनर्जन्म : समीर कुलकर्णी
तब्बल १७ वर्षे या क्षणाची वाट पाहावी लागली. आपली निर्दोष सुटका झाल्याबद्दल आनंद झाला आहे. या वर्षात अनेकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच हे प्रकरण इतके लांबले, असे कोणीही करू नये. न्यायालयाचा हा निर्णय माझ्यासह कुटुंबीयांसाठी पुनर्जन्म असल्याच्या भावुक भावना समीर कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com