कंत्राटी शिक्षकांचा वाढता भार

कंत्राटी शिक्षकांचा वाढता भार

Published on

कंत्राटी शिक्षकांचा वाढता भार
मुंबई विभागात १६,३०७ शिक्षक; राज्यातील संख्या ७१ हजारांवर
मुंबई, ता. ३ ः राज्यातील जिल्हा परिषदेसह महापालिका, विविध विभागांच्या तसेच अनुदानितच्या शाळांमध्ये तब्बल ७१ हजार ३१६ शिक्षक कंत्राटी तत्त्वावर असून, यात मुंबई उपसंचालक विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात तब्बल १६ हजार ३०७ कंत्राटी तत्त्वावर शिक्षक कार्यरत असल्याची माहिती शिक्षण विभागातील अहवालांवरून दिसून आली आहे. कंत्राटी शिक्षकांमध्ये यात एकट्या मुंबई शहर आणि उपनगरात चार हजार ३३३ आणि ठाण्यातील सहा हजार ९१२ शिक्षकांचा समावेश आहे.
तासिका तत्त्वावर चार हजार १५४ शिक्षक असून, यात कंत्राटी आणि तासिका तत्त्वावरील शिक्षकांची संख्या सर्वाधिक मुंबईतील शाळांमध्ये आहे. युडायस-प्लस २०२४-२५च्या माहितीनुसार राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये सहा लाख ६८ हजार ४७८ शिक्षक नियमितपणे कार्यरत आहेत, तर ७१ हजार ३१६ शिक्षक कंत्राटी आणि तासिका तत्त्वावर चार हजार १५४ असे एकूण सात लाख ४३ हजार ९४९ शिक्षक कार्यरत आहेत. यात एकट्या मुंबईत नियमित शिक्षकांची संख्या ५२ हजार ६१ तसेच कंत्राटी तत्त्वावरील चार हजार ३३३ आणि पार्टटाइम ४९१ असे एकूण ५६ हजार ८८५ शिक्षक कार्यरत आहेत.
मुंबई खालोखाल पुणे जिल्ह्यात सर्वाधिक असे ६६ हजार १९ शिक्षक कार्यरत आहेत, तर कंत्राटी तत्त्वावर आठ हजार ९६९ तर पार्टटाइम ५०४ असे एकूण ७५ हजार ४९२ शिक्षक एकट्या पुणे जिल्ह्यात कार्यरत आहेत, तर सर्वात कमी भंडारा जिल्ह्यात एकूण शिक्षकांची संख्या केवळ सहा हजार ८६२ इतकी आहे. यात नियमित शिक्षक सहा हजार ७३ आणि कंत्राटी ७०३ आणि पार्टटाइम ८६ इतके शिक्षक आहेत.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पटसंख्या कमी झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यात मुंबईतील शिक्षकांचे काही शिक्षक संघटनांच्या दबावामुळे मुंबईतील महापालिका शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळाच बंद झाल्याने शिक्षकांच्या समायोजनाचा मोठा प्रश्न अजूनही अधांतरी राहिला आहे.

शैक्षणिक परिणाम
शिक्षण हक्क कायद्यातील विविध तरतुदींनुसार प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्णवेळ आणि प्रशिक्षित तसेच गुणवत्तापूर्ण, पात्र शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य आहे. त्यात प्रसंगी केवळ १० टक्के रिक्त पदे असल्यास त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकांचा पर्याय अवलंबिला जातो, मात्र मोठ्या प्रमाणात कंत्राटी शिक्षकांची संख्या असल्यास त्यातून शिक्षकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांशी संवाद आणि शिकवण्यातील सातत्य यावर परिणाम होतो. तसेच अशा कंत्राटी भरतीमुळे शिक्षकांमध्ये अस्थैर्य वाढते आणि त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि गुणवत्तेवर होतो.

गुणवत्ता आणि दर्जावर परिणाम
कंत्राटी शिक्षकांना अनेकदा शैक्षणिक तयारीसाठी पुरेसा वेळ किंवा संसाधन उपलब्ध केली जात नाहीत. त्यात अलीकडे राज्यात काही खासगी संस्थांमार्फत हे शिक्षक पुरविले जातात, त्या संस्थांचा शैक्षणिक गुणवत्ता, दर्जा आदींशी काहीही संबंध नसतो. यामुळे त्यांच्याकडून निवड करून पाठविण्यात आलेल्या शिक्षकांच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित होतो. तसेच त्यांना अल्प मुदतीसाठी नियुक्त केले जात असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गाभा दुर्लक्षित राहतो आणि विद्यार्थ्यांच्या समग्र विकासात अडथळा निर्माण होण्याची अधिक शक्यता असते.
--
अशी आहे आकडेवारी
शहर नियमित शिक्षक कंत्राटी अर्धवेळ एकूण
मुंबई उपनगर १७६७३ १४३७ ६० १९१७०
मुंबई शहर ३४३८८ २८९६ ४३१ ३७७१५
ठाणे ४२२६२ ६९१२ ३०४ ४९४७८
पालघर १८४५६ २७१६ १०६ २१२७८
रायगड १८०२४ २३४६ ८० २०४५०
पुणे ६६०१९ ८९६९ ५०४ ७५४९२

Marathi News Esakal
www.esakal.com