काटई उड्डाणपुलावर अपघातांना निमंत्रण
काटई उड्डाणपुलावर अपघातांना निमंत्रण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ ः कल्याण-शिळ रस्त्यावर काटई नाका दिशेने जाताना पलावा पुलानंतर नवीन उड्डाणपूल वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरत आहे. नव्याने सुरू झालेल्या उड्डाणपुलावरून येणारी अवजड वाहने भरधाव वेगाने उतरत असल्याने जुन्या पुलावरून येणाऱ्या वाहनचालकांना त्यांचा अंदाज बांधता येत नाही. पुलाच्या उतारावरून सरळ अरुंद रस्त्यावर वळण घेणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पलावा चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी देसाई खाडी ते काटई नाका यादरम्यान नवीन उड्डाणपूल उभारण्यात आला. यामुळे मुंबईहून कल्याणकडे जाणारी वाहने पलावा चौकात न थांबता थेट नवीन पुलावरून काटई नाक्याकडे वळू लागली आहेत. परिणामी, पलावा चौकातील वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली आहे; मात्र रुणवाल सिटी परिसरात नव्याने कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.
जुना आणि नवा उड्डाणपूल एकाच ठिकाणी निळजे गावाजवळ एकत्र येतात; मात्र नवीन पुलाचा उतार अधिक उंच आणि तिरका असल्याने जुन्या पुलावरून येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज लागत नाही. याच ठिकाणी दोन्ही दिशांतील वाहने एकत्र येतात आणि अरुंद रस्त्यावर वळतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.
अपघातासाठी कारणीभूत ठरणारे मुद्दे
उतारावरील अतिवेग : नवीन पुलावर गतीमर्यादा निश्चित करण्यात आली असली, तरी वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. दुपारी वाहतूक कमी असताना अवजड वाहनांचा वेग अधिक असतो.
गतिरोधकांचा अपुरा उपयोग : पुलाच्या सुरुवातीस काही अंतरावर गतिरोधक बसवण्यात आले आहेत; मात्र उतारावर ती कमी पडतात.
तिरक्या दिशेने वाहनांचा प्रवेश : नवीन पुलावरून उतरणारी वाहने रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये तिरक्या पद्धतीने येतात, ज्यामुळे जुन्या पुलावरून येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज येत नाही.
रस्त्याचा त्रिकोणीय अरुंद भाग : नवीन पुलावरून येणाऱ्या वाहने अरुंद मार्गावर वळवली जात असून, अपूर्ण रुंदीकरणामुळे वाहनांची अडचण वाढली आहे.
उपाययोजनांची गरज
पुलाच्या उताराजवळील रस्त्याचे रुंदीकरण तातडीने पूर्ण करणे.
गतीमर्यादेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कडक उपाययोजना राबवणे.
उतारावर अधिक कार्यक्षम गतिरोधक बसविणे.
अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग किंवा वाहतूक नियंत्रण करणे.
दुर्घटनाग्रस्त ठिकाणी वाहतूक सिग्नल किंवा सावधानतेचे फलक लावणे.
सध्या या ठिकाणी वाहने सावकाश चालवण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतूक विभाग आणि महापालिकेने याकडे लक्ष देऊन लवकर उपाययोजना केल्यास संभाव्य दुर्घटना टाळता येतील.
........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.