बदलापुरात अघोषित भारनियमन

बदलापुरात अघोषित भारनियमन

Published on

बदलापुरात अघोषित भारनियमन
रोज तीन ते चार वेळा वीज गायब; रहिवासी त्रस्त

बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : शहरातील कात्रप परिसरात दररोज तीन ते चार वेळा अघोषित भारनियमन केले जात आहे. यामुळे या परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. दररोज न चुकता या परिसरात वीज गायब होत असल्याने आम्हाला महावितरणकडून अशी सापत्न वागणूक का दिली जात आहे, असा सवाल रहिवासी विचारत आहेत.

कात्रप गणेश घाट या परिसरात साधारण २५ ते ३० हजार लोकसंख्या आहे. रोज रात्री-अपरात्री कोणत्या ना कोणत्या वेळेत घरातील वीजपुरवठा खंडित होतो. कधी पाच मिनिटे तर कधी काही तासांसाठी वीज गायब असते. तर अनेकदा पाच, पाच मिनिटे म्हणून दिवसभरात चार ते पाच तास वीज गायब असते. वर्षाचे ३६५ दिवस इथल्या रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. या अघोषित भारनियमनाचा परिणाम परिसरातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. परिसरातील अनेक गृहसंकुले, इमारती असल्याने एकदा इमारतीच्या खालच्या टाकीतून, गच्चीवरील टाकीत पाणी चढवण्यासाठी पंप सुरू केला की तेवढ्यात वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे आपसूक त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. अन् नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळते. यासंबंधी वेळोवेळी महावितरणकडे तक्रार केली; मात्र यावर त्यांच्याकडेही ठोस उत्तरे नसल्याने फक्त राग व्यक्त करण्याशिवाय पर्यायच उरत नाही, अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली आहे.

साधारण उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये इन्व्हर्टरची सोय असल्याने त्या कुटुंबाला या भारनियमनाचा तसा फरक पडत नाही; मात्र मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा सकाळी घाईच्या वेळेत विजेचा खेळखंडोबा झाला तर मोठी पंचायत होते, अशी तक्रार महिलांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय कार्यकारी अभियंता आनंदा काटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी तक्रार खरेतर यायला नको; मात्र जर असे होत असेल तर याबाबत चौकशी करून यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली.

साधारण दहा वर्षांपासून मी कात्रप प्रेसिअस हर्मनी या गृहसंकुलात राहतो; मात्र वर्षभरात ३६५ दिवस होणाऱ्या भारनियमनाचा फटका आम्हाला बसत आहे. दिवसभरात कधीही आणि कितीही वेळासाठी वीज गायब असते. विशेष म्हणजे सकाळी सात ते आठच्या दरम्यान वीज जातेच. त्यानंतर दिवसभरात अनेकदा पुरवठा खंडित होतो. या प्रकारामुळे दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत आहे.
- गणेश गायकवाड, स्थानिक रहिवासी

वर्षाचे ३६५ दिवस आमच्या परिसरात रोज वेगवेगळ्या वेळेत अघोषित भारनियमन होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे महावितरणने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा.
- तन्मय तांबे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com