गतिमान ग्रामविकासासाठी ‘सरपंच संवाद’ प्रभावी ठरणार
पालघर, ता. ७ (बातमीदार) : ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये झालेल्या नावीन्यपूर्ण कामांची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, तसेच ग्रामविकास अधिक गतिमान व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ‘सरपंच संवाद’ हे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आणि जलजीवन मिशन या दोन महत्त्वाकांक्षी योजनांच्या उद्दिष्टांना पूरक ठरणारे हे अॅप एक प्रभावी डिजिटल साधन ठरणार आहे.
जलशक्ती मंत्रालयातर्फे आयोजित ‘स्वच्छ व सुजल ग्रामसाठी नेतृत्व’ या विशेष कार्यक्रमात जलशक्तिमंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते या अॅपचे उद्घाटन करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता, संवाद आणि नवोपक्रमांची देवाणघेवाण वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. ‘सरपंच संवाद’ अॅपमुळे सरपंच आपल्या गावातील यशस्वी उपक्रमांची माहिती देशभरातील इतर सरपंचांपर्यंत पोहोचवू शकतात. तसेच इतर गावांतील यशोगाथा पाहू शकतात, विविध विषयांवरील प्रशिक्षण घेऊ शकतात, महत्त्वाच्या बातम्यांची माहिती मिळवू शकतात आणि ऑनलाइन प्रमाणपत्रदेखील प्राप्त करू शकतात.
या अॅपबाबत माहिती देताना जिल्हा पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर यांनी सांगितले, की हे अॅप स्वच्छ भारत मिशन आणि जलजीवन मिशन या दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी एक परिणामकारक डिजिटल मंच ठरणार आहे.
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सरपंचांना आवाहन केले आहे, की या अॅपचा नियमित आणि प्रभावी वापर करून गावांचा स्वच्छ, सुजल व शाश्वत विकास साधावा. जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी ‘सरपंच संवाद’ हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये तत्काळ डाऊनलोड करून ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.