कबुतरखान्यावरील बंदीचे प्रकरण :
कबुतरखान्यावरील बंदी कायम
सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. एकच मुद्दा दोन न्यायालयांकडून हाताळणे अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवल्याने तूर्तास मुंबईतील कबुतरखाने बंद राहतील, हे निश्चित झाले आहे.
मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी याचिकाकर्त्या पल्लवी पाटील व अन्य काहींनी अपिलाद्वारे केली होती. त्यावर सोमवारी न्या. जे. के. महेश्वरी आणि न्या. विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. याविषयी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आम्ही हस्तक्षेप करणे उचित होणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच अंतरिम आदेशात बदल करण्याबाबत उच्च न्यायालयातच अर्ज करू शकता, असा सल्लाही न्यायालयाने अपील फेटाळताना दिला. त्यामुळे उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश कायम राहणार असल्याने मुंबईतील कबुतरखाने बंदच राहणार आहेत.
---
उच्च न्यायालयात उद्या सुनावणी
तत्पूर्वी, सद्य:स्थितीत आम्हाला सर्वसामान्यांच्या आरोग्याची चिंता महत्त्वाची आहे, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने मागील आठवड्यात कबुतरखाने सुरू करण्यास नकार दिला होता. तसेच जुने कबुरतरखाने सुरू ठेवायचे की नाही, त्याबाबत तज्ज्ञांची समितीच निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.१३) न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.