वाहतूक नियोजनात घोळ
वाहतूक नियोजनात घोळ
कळवा उड्डाणपूल चुकीच्या ठिकाणी उतरविल्याने कोंडी
ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) : ठाणे आणि कळव्याला जोडण्यासोबतच बेलापूर, नवी मुंबईकडे जाण्यासाठी कळवा खाडीवर बांधलेला पूल चुकीच्या ठिकाणी उतरविण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पूल उतरविलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, शाळा आणि कळवा स्थानकाकडे जाणारा रस्ता आहे. त्यामुळे येथील कोंडी नियंत्रित ठेवण्यासाठी वाहतूक विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सकाळ आणि संध्याकाळी वाहन चालकांना पाच मिनिटाचे अंतर कापण्यासाठी येथे दोन तासांचा अवधी लागत आहे.
ठाणे शहर आणि कळवा, नवी मुंबई, बेलापूरला जोडणारा पूल म्हणून कळवा खाडीपूल बांधण्यात आला आहे. १८६३ मध्ये बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल २०१६ मध्ये धोकादायक ठरवून वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर त्याच्याशेजारी दुसरा पूल बांधण्यात आला आहे. बांधलेला पूलदेखील वाहतुकीला अपुरा पडत असल्याने कळवा खाडीवर तिसरा पूल बांधला गेला आहे. तीन वर्षांपूर्वी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे; मात्र १८३.६६ कोटींचा निधी खर्च करून तयार केलेला पूल कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरविण्यात आला. परिणामी येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
शाळा, पालिकेचे रुग्णालय, कळवा स्थानकाकडे जाणारा रस्ता आहे. त्यामुळे येथे नेहमी गर्दी असते. पुढे काही अंतरावर अरुंद विटावा रेल्वेपुलाखालून बेलापूर, नवी मुंबई, दिघा, पटनी आदी ठिकाणी जाण्याऱ्या हजारो वाहनांची गर्दी होते. येथूनच पादचाऱ्यांना पायी जावे लागते. दुचाकीचालक विरुद्ध दिशेचा वापर करतात. शाळा परिसरात पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्याच्या कडेलाच गाड्या पार्क केल्या जातात. शाळा सुटल्यावर हा भाग वाहतुकीसाठी अधिक त्रासदायक ठरतो. कळवा स्थानकाकडे जाण्यासाठी याच परिसरात शेअरिंग रिक्षा स्टॅन्ड असल्याने कोंडीत आणखी भर पडत असते.
रहदारीचा मार्ग
विटावा कट येथील वसाहतीत राहणाऱ्या लाखो लोकांना याच अरुंद रस्त्याचा वापर करावा लागतो. पुढे सूर्यनगर गेटजवळ ग्रीन वर्ल्ड नामक मोठी उच्चभ्रू सोसायटी आहे. येथेही मोठ्या संख्येने लोक राहतात. दिघा स्थानकमधून येणारा लोंढाही याच मार्गाचा वापर करतो. पुलाखालून पुढे गेले असता मुकुंद कंपनी परिसरात राहणारे लोकसुद्धा येथून जातात. त्यामुळे या अरुंद रेल्वेपुलाच्या रस्त्यावर मोठा ताण येतो. काही फूट लांबीचा पूल पार करायला दोन तासांहून अधिकचा वेळ लागत आहे.
विटावा पुलाजवळ कोंडी
एमएमआरडीएने बांधलेला कळवा पूल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जवळ उतरविल्याने पुढे विटावा पुलाजवळ मोठी कोंडी होत आहे. हा पूल रेल्वेपुलाच्या पुढे उतरविणे गरजेचे असल्याची मागणी येथील रहिवासी करत आहेत.
कळवा पुलाखालील भाग आणि विटावा रेल्वेपूल अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवी मुंबईकडे जाणाऱ्या आणि ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवर वाहतूक कोंडी होत असते. पुलाच्या परिसरात दोन्ही बाजूने गर्दीच्या वसाहती आहेत. त्यामुळे दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांचीही या ठिकाणी मोठी गर्दी असते. वाहतूक विभागाकडून येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण करण्यासाठी कर्मचारी तैनात असतात.
पंकज शिरसाट, उपआयुक्त वाहतूक विभाग, ठाणे पोलिस आयुक्तालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.