गणेशोत्सव काळात बेस्टकडून जादा गाड्या
गणेशोत्सवात बेस्टकडून जादा गाड्या
२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबरदरम्यान रात्री ११ ते पहाटे पाचपर्यंत सेवा उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी केवळ मुंबईतलेच नाही तर महाराष्ट्रासह देश-विदेशातूनही भाविक, पर्यटक गर्दी करतात. या काळात सार्वजनिक वाहतुकीवर ताण येतो. विशेषतः रात्री उशिरापर्यंत दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांसाठी वाहतुकीची गैरसोय होते. याच पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री ११ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत विशेष बस धावणार आहेत.
बेस्ट उपक्रमाकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त बस एकूण दहा मार्गांवर सुरू राहतील. विशेष लक्ष शिवाजी पार्क, गिरगाव चौपाटी आणि मरीन लाइन्स या प्रमुख ठिकाणी जाणाऱ्या मार्गांवर केंद्रित करण्यात आले आहे. कांदिवली, बोरिवली, वांद्रे, मुलुंड, वडाळा, दादर आणि देवनार आदी आगारांतून या बस सोडल्या जाणार आहेत. प्रत्येक मार्गावर सरासरी तीन बस धावतील, तर काही महत्त्वाच्या मार्गांवर दोन बसची अतिरिक्त सोय असेल.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात फोर्ट, गिरगाव, चर्नीरोड, भायखळा, लालबाग आणि परळ या परिसरांत प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी या अतिरिक्त बससेवा दिल्या जाणार आहेत.
बेस्ट प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे, की गणेशोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा. उपलब्ध करून दिलेल्या विशेष बससेवांचा लाभ घेतल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल, असेही बेस्टकडून सांगण्यात आले आहे.
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.