विरार इमारत दुर्घटनेचे अखेर 37 तासानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले
विरार इमारत दुर्घटना
वाढदिवसाचा सोहळा बनला शोककळा
विजय गायकवाड, सकाळ वृत्तसेवा
नालासोपारा, ता. २८ : विरार पूर्वेतील विजयनगर भागात एका चारमजली अनधिकृत इमारतीचा अर्धा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, नऊ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका कुटुंबातील तिघांचा समावेश आहे, ज्यात एक वर्षाच्या चिमुरडीचा तिच्या वाढदिवसाच्याच दिवशी मृत्यू झाला.
चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या ओंकार जोविल यांची मुलगी उत्कर्षा हिचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता. रात्री नऊ ते ११ वाजेपर्यंत नातेवाईक आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर पावणेबारा वाजण्याच्या सुमारास इमारतीचा भाग कोसळला. यात उत्कर्षा आणि तिच्या आईचा जागीच मृत्यू झाला. ‘अजून ओंकार सुखरूप सापडेल,’ अशी आशा त्यांचे मित्र व नातेवाईक दुपारपर्यंत व्यक्त करीत होते; मात्र आज दुपारी १ वाजता त्याचाही मृतदेह सापडला. क्षणातच वाढदिवसाचा आनंद एका कुटुंबासाठी शोकांतिका बनला.
दरम्यान, दोन दिवसांपासून विस्थापित झालेल्या कुटुंबांना ‘आता आम्ही कुठे राहावे, काय करावे?’ असा प्रश्न भेडसावत आहे. या परिस्थितीत वसई विरार महापालिकेकडून तात्पुरत्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले.
ही दुर्घटना केवळ एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना नसून, अनधिकृत आणि निकृष्ट बांधकामांच्या धोक्याचा गंभीर इशारा आहे. या दुर्घटनेनंतर वसई-विरार महापालिका प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बचावकार्य आणि आव्हाने
दुर्घटना घडल्यानंतर तातडीने एनडीआरएफच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ३७ तास अथकपणे बचावकार्य चालवून त्यांनी १७ मृतदेह आणि नऊ जखमींना बाहेर काढले. दाट लोकवस्ती आणि अरुंद जागेमुळे बचावकार्यात अनेक अडथळे आले, पण श्वानपथक आणि अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यात आला. अखेरीस गुरुवारी दुपारी दीड वाजता बचावकार्य पूर्ण झाल्याची पूर्ण झाल्याची माहिती एनडीआरएफ कमांडो चंद्रकेतू शर्मा यांनी दिली.
कारवाईची मागणी
या घटनेने अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक नितील साने याला अटक केली आहे. नागरिकांमध्ये मात्र या घटनेबाबत तीव्र संताप आहे. इमारतीच्या निकृष्ट बांधकामासाठी केवळ बांधकाम व्यावसायिकच नव्हे, तर पालिका प्रशासनातील संबंधित अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
विरार इमारत दुर्घटनेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे बचावकार्य
विरार पूर्वेकडील विजयनगर येथे २६ ऑगस्ट रोजी रात्री रमाबाई अपार्टमेंट नावाची इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिका, अग्निशमन दल आणि पोलिस यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीच्या नऊ जणांनंतर मात्र ढिगाऱ्याखालून केवळ मृतदेहच बाहेर काढण्यात आले. मृतांची संख्या वाढल्याने पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, खासदार हेमंत सावरा, आमदार स्नेहा दुबे-पंडित, आमदार राजन नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गेले ३७ तास सुरू असलेल्या या बचावकार्यात अनेक वरिष्ठ अधिकारी आणि एनडीआरएफ टीमचे प्रमुख प्रमोदकुमार सिंग आणि चंद्रकेतू शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.