टीओडी मीटर वाद पुन्हा पेटला
बदलापूर, ता. २ (बातमीदार) : टीओडी मीटर बसविण्याच्या मुद्द्यावर बदलापुरात पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. महावितरणकडून सक्तीने मीटर बदलण्याचे काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आला आहे. बदलापूर पूर्वेतील प्रेशियस हार्मनी सोसायटीत मंगळवारी (ता. २) सकाळी महावितरणचे कर्मचारी येऊन जुने डिजिटल मीटर काढून टीओडी बसवण्यास सुरुवात केली; मात्र सोसायटीतील नागरिकांनी याला विरोध दर्शविला.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्यास पोलिसात तक्रार दाखल केली जाईल, असा इशारा दिल्याचे रहिवासी गणेश गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रेशियस हार्मनी ही मोठी व जास्त लोकसंख्या असलेली सोसायटी आहे. येथील जुने डिजिटल मीटर काढून टीओडी मीटर लावण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. या मीटरमुळे वीजबिल वाढते, असा अनुभव अनेकांना आल्यानंतर देशभरातच टीओडी मीटरविरोधात आंदोलने झाली होती. काही महिन्यांपूर्वी बदलापुरातही मविआच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीने मीटर बदलले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. तरीदेखील मंगळवारी कात्रप परिसरातील प्रेशियस हार्मनी सोसायटीत सक्तीने मीटर बदलण्यास सुरुवात करण्यात आली. यावर रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी महावितरणकडे मागणी केली, जर खरोखरच सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सक्तीचे आदेश असतील, तर त्याची लेखी प्रत दाखवावी; अन्यथा सहकार्य करणार नाही.
मुख्यमंत्र्यांचाही विरोध
विधान परिषदेच्या अधिवेशनात मविआच्या आमदारांनी टीओडी मीटर सक्ती का केली जात आहे? याबाबत प्रश्न विचारून सरकारला धारेवर धरले होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही ग्राहकाला त्याच्या मर्जीविरोधात महावितरणकडून टीओडी मीटरसाठी सक्ती करता येणार नाही, असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य व्हायरल होत असताना, बदलापुरातील महावितरण अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात का वागत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महावितरणचे कर्मचारी सक्तीने टीओडी मीटर लावत असताना त्यांना विरोध केला. मुख्यमंत्र्यांचे मीटर सक्ती करू नये असे आदेश असताना बदलापूरचे महावितरण कर्मचारी आणि अधिकारी असे का वागत आहेत? असा प्रश्न पडला आहे.
- गणेश गायकवाड, रहिवासी
प्रेशियस हार्मनी
आम्हाला सरकारचे तसे आदेशच आहेत की, एप्रिल २०२६ पर्यंत शहरातील सगळेच जुने मीटर बदलून त्या ठिकाणी नवे टीओडी मीटर बसवावे. सरकारच्या आदेशाचे पालन करत असून, फक्त नादुरुस्त मीटरच नाही तर सरसकट सगळेच मीटर बदलण्याचे काम सुरू केले आहे.
- आनंद काटकर, मुख्य अभियंता
महावितरण कार्यालय बदलापूर
अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी टीओडी मीटरसाठी सक्ती करू नये, असे आदेश दिले होते. महाविकास आघाडीने यासंदर्भात काही महिन्यांपूर्वीच मोठे जन आंदोलन उभारले होते. त्यावेळी महावितरणने ही सक्ती मागे घेतली होती. आता पुन्हा सक्ती होत असेल तर तक्रार केली जाईल. महावितरण अधिकारी तक्रार ऐकून घेणार नसतील तर याविरोधात न्यायालयात दाद मागू.
- अविनाश देशमुख, प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.