पेण तालुक्यात जलबोगदा प्रकल्प;

पेण तालुक्यात जलबोगदा प्रकल्प;

Published on

पेण तालुक्यात जलबोगदा प्रकल्प
नवी मुंबईला पाणी, खारेपाट मात्र तहानलेले
पेण, ता. ३ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील जिते ते बेलवडे ग्रामपंचायत हद्दीतून सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईकडे जलद गतीने पोहोचवण्यासाठी जलबोगदा (टनेल) प्रकल्पाचे काम गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्‍पाला गती आली असून त्याद्वारे नवी मुंबई महापालिकेची पाण्याची गरज पूर्ण होणार आहे; मात्र येथील स्‍थानिक खारेपाट विभागातील नागरिकांना पाणीटंचाई जाणवत असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीखाली सुमारे ३०० मीटर खोलवर पाइपलाइन घालून नवी मुंबईला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. हा प्रकल्प कोट्यवधी रुपयांचा आहे; मात्र याच वेळी पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील नागरिकांना वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. हेटवणे धरणाचे पाणी त्यांच्या दारात असूनही त्यांना त्याचा लाभ का मिळत नाही? नवी मुंबईसाठी एवढ्या वेगाने प्रकल्प पूर्ण करण्याची घाई का, तर स्थानिकांसाठी वर्कऑर्डर काढण्याची प्रक्रिया अद्याप का सुरू झालेली नाही, असा सवाल स्‍थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या खोदकामात स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना मोबदला मिळाला का, याबाबतही संभ्रम आहे. याशिवाय, या प्रकल्पाविषयी ग्रामस्थांना पूर्वकल्पना देण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच शासनाची रॉयल्टी रीतसर भरली आहे का, याची खात्री करणे आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
..................
कायद्याचे उल्लंघन?
२०१८च्या धरण बचाव कायद्यानुसार धरण परिसरापासून २०० मीटर अंतरावर कोणतेही खोदकाम करता येत नाही; मात्र या प्रकल्पासाठी धरणाजवळ खोदकाम होत असल्याने हा कायद्याचा भंग असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे. त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
...................
शासनाची भूमिका
यासंदर्भात तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नरेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलवडे येथील सर्वे नंबर २३८ मध्ये उत्खनन झालेल्या जागेची रॉयल्टी चार टप्प्यांत भरली जात आहे. आतापर्यंत दोन हजार ब्रास रॉयल्टीतून १२ लाख रुपये महसूल जमा झाला आहे, तर पुढील रॉयल्टीची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले, की ब्लास्टिंग होत नसल्यामुळे हेटवणे धरणाला धोका नाही.
...................
स्थानिकांचा संताप
खारेपाट विभागातील जनता मात्र या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करीत आहे. हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला जात असताना स्थानिकांना पाण्यासाठी आजही लढा द्यावा लागत आहे. या ठिकाणी सिडकोला एवढी घाई का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com