खड्ड्यांमुळे दिघावासीय त्रस्त
खड्ड्यांमुळे दिघावासीय त्रस्त
अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी; उपाययोजनेची गरज
वाशी, ता. ४ (बातमीदार) : दिघा एच-प्रभाग समिती क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडलेले असून, पावसाळ्यामुळे अनेक मार्गांवर खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी (ता. ३) दिघा येथील संजय गांधी नगर प्रवेशद्वाराजवळील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात झाला, यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे स्थानिकांकडून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दिघ्यातील सर्व प्रभागात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. प्रभाग एक व दोनमध्ये रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने संपूर्ण पावसाळ्यात नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार विभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतरही गणेशोत्सवाच्या काळात खड्ड्यांची डागडुजी करण्यात आलेली नसल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वी दिघा गाव रेल्वेस्थानकाजवळ मुकुंद कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण हाती घेतले होते, मात्र पावसाळ्यात सुरू झालेल्या या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट राहिला असून, मागील दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावरची स्थिती अजून दयनीय झाली आहे. ईश्वरनगर ते मुकुंद कंपनी, रामनगरकडे जाणारा रस्ता, संजय गांधी नगर, महात्मा फुले नगर, यादव नगरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जुलै महिन्यात पालिकेकडून तात्पुरते खड्डे बुजवले तरी मुसळधार पावसाने ते काम निष्फळ ठरले आहे. मुकुंद कंपनी ते ईश्वरनगरच्या मार्गावर काँक्रीटीकरण हाती घेतले तरी उर्वरित रस्त्याची दयनीय अवस्था आहे. २ सप्टेंबर रोजी या मार्गावरून दिघा आणि वेशीवरील कळवा पूर्व परिसरातील नागरिकांना गणरायाला खड्डेमय रस्त्यातून निरोप द्यावा लागला.
...............
बळी गेल्यावर पालिका जागी होणार का?
अर्धवट राहिलेले रस्त्याचे काँक्रीटीकरण, रस्त्याच्या दोन्ही दिशेला पदपथाजवळ खड्डे आणि माती वाहून रस्त्यावर आल्याने विभागातील सर्व रस्त्यांवर अपघात घडत आहेत. बुधवारी (ता. ३) दिघा येथील संजय गांधी नगर प्रवेशद्वाराजवळील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा अपघात झाला, यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे पालिकेला एखाद्याचा बळी गेल्यानंतरच जाग येणार का, असा सवाल केला जात आहे.
..................
केबलच्या जाळ्यामुळे रस्त्याची दुर्दशा
मागील वर्षभरापासून अनेक कंपन्यांनी, विशेषत: विनापरवाना केबल कंपन्यांनी रस्त्यावर जाळे टाकले आहे. रस्ता खोदल्याने आणि योग्य प्रकारे डागडुजी न केल्याने पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये भर पडली आहे. चांगल्या स्थितीतील रस्त्यांवर होणारी ही नुकसानकारक कामगिरी नागरिकांना मोठा त्रास देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.