महाराष्ट्राची समुद्री क्षेत्राच्या महासत्तेकडे वाटचाल

महाराष्ट्राची समुद्री क्षेत्राच्या महासत्तेकडे वाटचाल

Published on

राज्याची समुद्री क्षेत्राच्या महासत्तेकडे वाटचाल!
मुख्यमंत्र्यांचे उद्‍गार; मोदींच्या हस्ते कंटेनर टर्मिनल फेज-२चे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : जेएनपीए पोर्टमधील वाढत्या व्यापारामुळे महाराष्ट्र येत्या १०० वर्षांत समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीए) येथील सिंगापूर बंदर प्राधिकरण (पीएसए) मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२चे हैदराबाद हाउस, नवी दिल्ली येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्‍घाटन केले. या ऐतिहासिक सोहळ्याकरिता फडणवीस उरणमधील कंटेनर टर्मिनल फेज-२ येथे उपस्थित होते.
या दुसऱ्या टप्प्याचे उद्‍घाटन ही ऐतिहासिक घटना आहे. भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू झाला असून, हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पाचे यश पंतप्रधान मोदींच्या ‘अमृत काल दृष्टिकोना’ला समर्पित केले. या समारंभाला केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दूरदृश्यप्रणालीद्वारे, तर खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रशांत ठाकूर, पराग शहा, चीफ कमिशनर कस्टम विनल श्रीवास्तव आणि जेएनपीएचे प्रमुख उन्मेश वाघ यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
वाढवण बंदराच्या कार्यान्वयनामुळे जेएनपीए लवकरच जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये स्थान मिळवेल. यामुळे महाराष्ट्र पुढील १०० वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भारत आणि सिंगापूर यांच्यात नवीन करारनाम्यांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होईल. या टर्मिनलमुळे महाराष्ट्राने भारतातील बंदर क्षमतेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले. जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
...
व्यापक मल्टिमॉडल नेटवर्क
या फेज-२ विस्तारामुळे बीएमसीटीची क्षमता २.४ दशलक्ष टीईयूपासून दुप्पट होऊन ४.८ दशलक्ष टीईयू झाली आहे. हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेद्वारे ६३हून अधिक इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी)शी जोडले गेले असून, हे भारतातील सर्वांत व्यापक मल्टिमॉडल नेटवर्क आहे. जून २०२५ पासून हे टर्मिनस ‘सुविधांसाठी तयार’ होते आणि आजच्या उद्‍घाटनामुळे राज्यातील लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्राला नवीन आयाम मिळणार आहे.
...
१०० टक्के अक्षय ऊर्जेवर कार्यरत
केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी या वेळी केंद्र सरकारच्या सागरी विकास धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली, तर जेएनपीएचे प्रमुख उन्मेश वाघ यांनी टर्मिनलच्या विस्ताराबाबत प्रास्ताविक  केले. पीएसए इंटरनॅशनलद्वारे चालवले जाणारे हे टर्मिनल १०० टक्के अक्षय ऊर्जेवर कार्यरत आहे. समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अनुरूप असलेले भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल आहे. या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता ४.८ दशलक्ष टीईयू इतकी झाली असून, घाटाची लांबी २,००० मीटरपर्यंत वाढली आहे. यात २४ घाट क्रेन आणि ७२ रबर-टायर्ड गॅन्ट्री क्रेन (आरटीजी) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com