प्रारूप प्रभाग शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस

प्रारूप प्रभाग शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस

Published on

प्रारूप प्रभागरचनेवर शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस
अखेरच्या दिवशी सुमारे २०० हरकती दाखल
ठाणे, ता. ४ (वृत्तसेवा) : आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे. त्यानंतर आता या प्रभागरचनेवर हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत. या प्रारूप प्रभागरचनेवरील हरकती नोंदविण्याची शेवटची मुदत ४ सप्टेंबर असून, या एका दिवशी सुमारे २०० हरकतींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत २६१ हरकती नागरिकांनी नोंदविल्या असल्याचे दिसून येत आहे.
२०१७ साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. असे एकूण ३३ प्रभागांतून १३१ नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही. यात चार सदस्यांच्या प्रभागरचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे. या प्रारूप आराखड्यावर महापालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. प्रारूप प्रभागरचना आराखड्यावर २ सप्टेंबरपर्यंत केवळ १६ हरकती व सूचना नागरिकांनी दाखल केल्या आहेत. गणेशोत्सवात अनेक जण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याचे बोलले जात होते. गौरी-गणपती विसर्जन होताच या उत्सवातून उसंत मिळालेल्या नागरिकांनी एकाच दिवसात म्हणजे ३ सप्टेंबर रोजी ४४ तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे तक्रारींची संख्या ६१ इतकी झाली आहे.
दरम्यान, बुधवारी (ता. ३) एका दिवसात ४४ हरकतींची नोंद करण्यात आल्यानंतर गुरुवारी हरकती नोंदविण्याच्या शेवटच्या दिवशी हरकती व सूचनांचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. या एकाच दिवशी सुमारे २०० हरकतींची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे आतापर्यंत २६१ हरकती नागरिकांनी नोंदविल्या असल्याचे दिसून येत आहे. उशिरापर्यंत आलेल्या हरकती नोंदविण्याचे काम सुरू असून, यामध्ये आकडेवारी वाढण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.

चौकट
दिवा येथील प्रभाग क्र. २९ मध्ये २७ व २८ मधील भागांचा जबरदस्तीने समावेश करण्यात आला आहे. यामुळे भौगोलिक सलगता तुटली असून, लोकसंख्या असमतोल निर्माण झाला आहे. परिणामी प्रभाग क्र. ३०वर १५-१८% अतिरिक्त लोकसंख्येचा भार पडला आहे. ‘‘ही विभागणी पूर्णपणे कायदेशीर निकषांच्या विरोधात असून, जनतेच्या न्याय्य प्रतिनिधित्वावर सरळ आघात असल्याची माहिती ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिली. तसेच फाउंडेशनच्या निवेदनात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५(३), कलम ६ व ७अ तसेच भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ आणि अनुच्छेद २४३टी यांचा भंग झाल्याचे नमूद केले आहे. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाच्या २९ डिसेंबर २०२१च्या आदेशानुसार ±१०% लोकसंख्या मर्यादा पाळली गेली नाही, असा ठोस पुराव्यानिशी दावा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com