खवय्यांचा मासळीवर ताव
खवय्यांचा मासळीवर ताव
आवकही वाढली
वज्रेश्वरी, ता. ८ (बातमीदार) ः गणपतीच्या विसर्जनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी रविवार आल्याने चिकन, मासे, मटण विक्रीच्या दुकानांत सकाळपासून ग्राहकांची मोठी गर्दी उसळली होती. शहरातील बाजारपेठेमध्ये मासळी खरेदीसाठी गर्दी वाढली. परिणामी मासळीचे भावदेखील श्रावणपेक्षा रविवारी (ता. ७) वाढले होते. गणेशोत्सवानंतर अनेक मांसाहारप्रेमींनी बाजारात मासे, मटण, चिकन खरेदीला गर्दी केली. श्रावण, तसेच त्यापाठोपाठ येणारा गणेशोत्सव या कालावधीत अनेक जण मांसाहार करणे टाळतात. अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर खवय्ये पुन्हा मांसाहाराकडे मोर्चा वळवतात. यंदा अनंत चतुर्दशीनंतर लागूनच रविवार आल्यामुळे मांसाहारप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली. सकाळपासून नवी मुंबईतील मांसविक्रीच्या दुकानांत ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तसेच दिवाळे येथील मासळी मार्केटसह शिरवणे, वाशी आदी ठिकाणी भरणाऱ्या बाजारात खवय्यांनी मासळी खरेदीसाठी गर्दी केली होती.
सर्वत्र १० दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाल्याने खवय्ये मटण, कोंबडी वडे व मासळीवर ताव मारत आहेत. तसेच समुद्रात मासेमारीसाठी होड्यादेखील जात आहेत. परिणामी येथील ग्रामीण भागातील नागरिकांची नदी, नाले, तलावावर सध्या मासेमारी जोरात सुरू आहे. सध्या पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणात मासळी सापडत आहे. त्यामुळे मासळीची आवक वाढली आहे. वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली, तसेच उसगाव येथे तानसा नदीवर पावसामुळे मासे मुबलक सापडत आहेत. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटक व खवय्यांची चंगळ झाली असून, ते मासळीवर ताव मारताना दिसत आहेत.
सध्या वातावरण अनुकूल असल्याने नदी, नाल्यावर मासेमारी सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या विश्रांतीनंतर मासळीची चांगली आवक वाढली आहे. त्यामुळे येथील अंबाडी नाका, वज्रेश्वरी व उसगाव येथे ताजी मासळी सहज उपलब्ध होते. अनेक लोक व पर्यटक खास ताजी मासळी खाण्यासाठी येथे येतात. तर येथील हॉटेल, खानावळ, व ढाब्यावर मासळी मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे, त्यात कोळंबी, सुरमई, रावस, टोळ, कर्ली, घोळ व पापलेट आदी माशांना येथील ढाब्यावर खवय्यांकडून पसंती मिळत आहे. अंबाडी येथील विनोद पाटील यांनी सांगितले की, श्रावण पाळला होता. श्रावणानंतर गणपती आले. त्यामुळे मांसाहार बंद होता; मात्र आता गणरायाचे विसर्जन केल्यानंतर मांसाहाराला सुरुवात केली आहे.
विक्रीत वाढ
श्रावण नुकताच संपला आहे. तसेच गणरायाचे विसर्जनदेखील झाले आहे. त्यामुळे नागरिक आता मांसाहार करू लागले आहेत. मांसाहारात चिकन, मटणसोबतच मासळीला विशेष पसंती आहे. तसेच गणपतीसाठी अनेक चाकरमानी गावी आले आहेत. त्यांचा कल मासळी खाण्यावर अधिक आहे. मासळीदेखील मुबलक, ताजी व स्वस्त मिळत असल्याने खवय्ये खूश आहेत. परिणामी विक्रीसुद्धा चांगली होत आहे, असे मासळीविक्रेत्या वासंती कोळी यांनी म्हटले.
मासळी भाव (प्रतिकिलो रुपयांत)
बोंबील : २०० ते ३००
पापलेट मध्यम : ६०० ते ७००
पापलेट मोठे : १००० ते १२००
सुरमई, रावस : ७०० ते ८००
मांदेली : १५०
लाल छोटी कोळंबी : ४००
बांगडा मालवणी : ३००
हलवा : ६००
टोळकी : ४००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.