नारिंगी उड्डाणपूल अद्याप अपूर्णच

नारिंगी उड्डाणपूल अद्याप अपूर्णच

Published on

वसई, ता. ७ (बातमीदार) : वसई-विरार शहरात नवीन उड्डाणपुलांचे जाळे विस्तारले जाणार असून, लवकरच कोंडी फुटणार, अशी आश्वासने लोकप्रतिनिधी देत आहेत, मात्र विरार पूर्व-पश्चिम परिसराला जोडणाऱ्या नारिंगी उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे कोंडीचे ग्रहण काही केल्या सुटत नाही, अशी परिस्थिती आहे. परिणामी हजारो वाहनचालकांचे रोजच हाल होत आहेत.

वसई, नालासोपारा आणि विरार शहरात लाखो वाहनांची वर्दळ आहे. औद्योगिक वसाहतीकडे ये-जा करणारी वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. शालेय बस, खासगी वाहतूक सेवा यासह दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश आहे. महापालिका प्रशासन कोट्यवधींचा खर्च करून रस्ते तयार करते, मात्र वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे. शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडीत नागरिकांचा श्वास गुदमरत असतो. त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावे, यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

शहरात अवघे ५०० मीटर अंतर कापण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तास वेळ जातो. लांब पल्ल्याच्या गाड्या नारिंगी फाटक येथून ये-जा करताना रेल्वे फाटक बंद ठेवण्यात येते. त्यामुळे दोन्ही दिशेला वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात. आता पाच वर्षांहून अधिक काळ उलटला, तरी नारिंगी उड्डाणपूल रहदारीसाठी खुला झाला नाही. विरार येथील उड्डाणपुलाखाली वाहतुकीचा खोळंबा होत आहे. लोकप्रतिनिधींनी नारिंगी उड्डाणपूल लवकर सुरू होणार, असे आश्वासन दिले असले तरी अद्याप कार्यवाही झाली नाही.

एकीकडे वाहतूक व्यवस्थेला उभारी देण्यासाठी या उड्डाणपुलाला पर्यायी मार्ग म्हणून पाहिले जाते, मात्र अनेक वर्षे काम सुरूच आहे. त्यामुळे रहदारीसाठी उड्डाणपूल कधी खुला होणार आणि वाहतूक कोंडी फुटणार, याची केवळ प्रतीक्षाच प्रवाशांना करावी लागत आहे.

मार्गावर वाहनांच्या रांगा
विरार येथे पूर्व आणि पश्चिम दिशेकडे जाण्यासाठी नारिंगी येथे उड्डाणपुलाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे विरार पश्चिम-पूर्वेकडील नारिंगी फाटक, चंदनसार मार्ग, साईनाथ नाका, विरार पूर्वेकडील जीवदानी रोड यासह आजूबाजूच्या परिसरातील मार्गावर वाहनांच्या रांगा रोज पहावयास मिळतात. रस्ते नादुरुस्त आणि त्यात कोंडीचा भार सहन करत प्रवासातून वाट काढावी लागताना हाल होत आहेत.

वसईचा उड्डाणपूल नादुरुस्त
वसई पूर्व-पश्चिमेतील रहदारीसाठी दोन उड्डाणपूल आहेत. त्यातील एक पूल नादुरुस्त आहे. त्यामुळे एकाच पुलावर वाहनांचा भार येत आहे. हा उड्डाणपूल कधी दुरुस्त होणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. लोकप्रतिनिधी पाठपुरावा कधी करणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com