कामगारनगरी भिवंडीत निवारा केंद्र नावालाच

कामगारनगरी भिवंडीत निवारा केंद्र नावालाच

Published on

संजय भोईर : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. ८ : कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात रोजगाराच्या शोधात येणाऱ्या हजारो कामगार आणि वृद्धांना निवाऱ्याची सोय नसल्याने शहरातील सामाजिक प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत बेघरांसाठी निवारा केंद्र सुरू केले आहे. मात्र, सद्यस्थितीत ते अल्पसंख्याक ठरत असून, हजारो बेघर नागरिक आजही उड्डाणपुलांखाली, दुकानांच्या पायऱ्यांवर आणि मिळेल त्या छताखाली रात्र काढत आहेत.
महापालिकेच्या वतीने बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत चालवण्यात येणारे सहारा शहरी बेघर निवारा केंद्र पूर्वी बसस्थानकाच्या बाजूला होते. परंतु, ती इमारत धोकादायक झाल्यामुळे सध्या हे केंद्र भादवड येथील एका इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. या केंद्रात एकाच इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर महिला व पुरुषांसाठी निवाऱ्याची सोय आहे. सद्यस्थितीत निवारा केंद्रात सुमारे ३० महिला आणि ३० ते ३२ पुरुष आसरा घेत असून हे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. या निवारा केंद्राबाबत शहरातील बेघर नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती किंवा माहितीचा प्रसार नसल्यामुळे अनेक बेघर नागरिक उड्डाणपुलांखालीच आसरा घेत असल्याचे चित्र आहे.
हजारो कामगारांचे शहर असलेल्या भिवंडीत केवळ एकाच इमारतीत दोन निवारा केंद्र असल्याने शहरातील इतर हजारो बेघरांना आसरा द्यायचा कोणी, हा खरा प्रश्न आहे. उड्डाणपूल, मंदिर, मस्जिद आणि दुकानांच्या पायऱ्यांवर आसरा घेणाऱ्या बेघरांची वाढती संख्या पाहता, पालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन बेघरांसाठी आवश्यक सोयी करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


उड्डाणपुलांखाली रात्र
भिवंडी-कल्याण मार्गावरील भादवड, टेमघर, नवी वस्ती, रावजीनगर, कल्याण नाका या भागांसह स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाखालील वंजारपट्टी नाका परिसरात बेघर लोक रात्र काढत आहेत. दिवसा मोलमजुरी करून अनेक जण पावसाळ्यातही याच उड्डाणपुलांखाली आपला निवारा घेत आहेत.

केंद्रात मिळणाऱ्या सुविधा
महापालिकेच्या प्रभाग समिती दोनच्या कार्यालयावर असलेल्या या निवारा केंद्रात सध्या अंदाजे ३० महिला व ३० ते ३२ पुरुष निवारा घेत आहेत. या निवारा केंद्रात बेडची व्यवस्था, सकाळचा चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र, येथे निवारा घेणारे बहुतेक नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत.


भिवंडी : बेघर नागरिक उड्डाणपुलाखालीच आसरा घेत आहेत.
भिवंडी : निवारा केंद्राची झालेली दुरवस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com