कृषि विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञान, प्रयोगशाळेचे केंद्र
कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञान, प्रयोगशाळेचे केंद्र
कृषी तंत्रज्ञान महोत्सवात डॉ. मकरंद जोशी यांचे प्रतिपादन
वाणगाव, ता. १४ (बातमीदार): कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञान आणि प्रयोगशाळेचे केंद्र आहे. केंद्रातील नवीन तंत्रज्ञान शिकून प्रत्यक्ष शेतात लागू केल्यास उत्पादनात वाढ होणे शक्य होईल. आजच्या युगात पारंपरिक शेतीसोबत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. हवामानातील बदल, पाण्याचे व्यवस्थापन, मृद स्वास्थ्य संवर्धन आणि पीक विविधीकरण या बाबींवर शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. स्मार्ट सिंचन पद्धती, जैविक शेती आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक किफायतशीर करता येते. असे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांनी कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सव कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे केले आहे.
पालघर जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे ता. ९ ते ११ ऑक्टोबर या कलावधीत कृषी तंत्रज्ञान महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी, महिला शेतकरी गट, युवा उद्योजक, कृषी तंत्रज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजित करण्यात सर नेस वाडिया फाउंडेशन यांचे सहकार्य मिळाले. कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कृषी शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्दिष्ट सांगून कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. केंद्राचे शास्त्रज्ञ भारत कुशारे यांनी नैसर्गिक शेती, भातलागवड, डॉ. उत्तम सहाणे यांनी मधुमक्षिका पालन, पीक संरक्षण, गृह विज्ञान तज्ज्ञ रूपाली देशमुख यांनी अन्नप्रक्रिया, अळंबी संवर्धन, अशोक भोईर यांनी भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान, प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रशांत वरठा यांनी गांडूळखत निर्मिती, अनिलकुमार सिंह यांनी डिजिटल मार्केटिंग, रिझवाना सय्यद, दामिनी तांडेल यांनी हवामान आधारित शेती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या ॲप्स शेतकऱ्यांनी डाऊनलोड करून तंत्रज्ञान अवगत करावे. रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांचे संरक्षण करण्यासाठी जैविक कीड आणि रोगनाशकांचा वापर करावा. कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध शेतीपूरक व्यवसायांच्या प्रशिक्षणात सहभागी होऊन युवकांनी स्वयंरोजगारक्षम उपक्रम राबवावेत. कमी खर्चाची नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा.
- डॉ. मकरंद जोशी, विस्तार शिक्षण संचालक, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.