‘फराळ सखी’ आता राष्ट्रीय ब्रँड

‘फराळ सखी’ आता राष्ट्रीय ब्रँड

Published on

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गेल्या वर्षीपासून महापालिकेने फराळ सखी हा उपक्रम सुरू केला आहे. आता हा उपक्रम अन्य राज्यातही सुरू करण्याचा निर्णय नीती आयोगाने घेतला असून, हरियानामध्ये त्याची सुरुवात झाली आहे, तर गोव्यातही त्याचा लवकरच प्रारंभ होणार आहे.

महिलांना स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. या दृष्टिकोनातून मिरा-भाईंदर महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्यावर्षीपासून ‘फराळ सखी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. दिवाळीनिमित्त शहरातील महिला बचत गटांच्या माध्यमातून फराळ तयार करून त्याची विक्री करण्यात आली. फराळ दर्जेदार व चविष्ट असावा, यावर कटाक्षाने भर देण्यात आला. त्यासाठी महिला बचत गटांना तज्ज्ञ आचाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धात्मक बाजारात टिकण्यासाठी फराळाचे आकर्षक पॅकिंग व डिझाईन कसे असावे, याकडेही विशेष लक्ष देण्यात आले. महिलांनी तयार केलेल्या फराळाला ‘फराळ सखी’ हे ब्रँड नेम देण्यात आले. गेल्यावर्षी तीन टन चविष्ट पदार्थांची विक्री केली. त्यामुळे या उपक्रमाची थेट केंद्र सरकारच्या नीती आयोगाने दखल घेतली व या उपक्रमाला मान्यता दिली. ही संकल्पना नीती आयोगाच्या चमूला एवढी आवडली की, त्याची अंमलबजावणी आता अन्य राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयोगाच्या पुढाकाराने हरियानामध्ये हाच उपक्रम ‘देशी स्वाद’ या नावाने सुरू झाला आहे, तर गोवा राज्यात या उपक्रमाचे नीती आयोगाकडून नुकतेच सादरीकरण पार पडले असून, त्या ठिकाणीही लवकरच त्याची सुरुवात होणार आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशात हा उपक्रम लागू करण्याचा आयोगाचा मानस आहे. ‘फराळ सखी’ उपक्रमाचे यश पाहून यावर्षी महापालिकेने महिलांना घोडबंदर बस स्थानकातील सुमारे २,६०० चौरस फुटांची प्रशस्त जागा उपक्रमाच्या स्वयंपाकघरासाठी दिली आहे. केवळ दिवाळीच नाही तर गणेशोत्सवातही या महिलांनी मोदक तयार करून त्याची यशस्वी विक्री केली. तंत्रज्ञानाचा उपयोग करीत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रशिक्षणासाठी टीएमआय ही संस्थादेखील ‘फराळ सखी’ या उपक्रमात सहभागी झाली आहे. त्यामुळे महिलांचे कौशल्य आणखी सुधारण्यात मदत होणार आहे.

महिलांना पाठबळ देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी महापालिकेने ‘फराळ सखी’ उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाची आता राष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली असून, या उपक्रमापासून स्फूर्ती घेत अन्य राज्यातील महिलांसाठी नीती आयोगाने हा उपक्रम सुरू केला आहे.
- राधाबिनोद शर्मा, आयुक्त, मिरा भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com