भिवंडीतील कामगारांची दिवाळी अंधारात
भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : यंत्रमाग उद्योगासाठी ‘मँचेस्टर ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीतील यंत्रमाग कामगारांना आजही योग्य हक्क, ओळख आणि आर्थिक सुविधा मिळालेल्या नाहीत. अनेक दशकांपासून शहराच्या विकासात हातभार लावणारे हे कामगार दरवर्षीप्रमाणे यंदाही बोनसपासून वंचित राहिल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.
भिवंडी शहरातील अनेक कामगार विविध भागांत आपल्या कुटुंबांसह स्थायिक झाले आहेत. शहरात आणि परिसरात होणाऱ्या निवडणुकांमध्ये या कामगारवर्गाच्या मतांचा वापर करून लोकप्रतिनिधी निवडून येतात; मात्र त्यांच्या मूलभूत समस्यांकडे कोणीही लक्ष देत नाही. अनेक कामगार दशकांपासून यंत्रमागावर कार्यरत असले तरी त्यांना अधिकृत कामगार म्हणून ओळख देण्यात आलेली नाही. शहरातील अनेक यंत्रमागांची सरकारकडे नोंदच नसल्याने कामगारांचीही अधिकृत नोंद नाही. परिणामी, सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अनेक कारखानदार आपल्या कामगारांना ओळखपत्र देत नाहीत. त्यामुळे १०-१२ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारालाही गरज पडल्यास मालक आपला कर्मचारी असल्याचे नाकारतो. या स्थितीसाठी कामगार कार्यालयातील अधिकाऱ्यांची निष्क्रियता जबाबदार असल्याचा आरोप लाल बावटा सिटू कामगार संघटनेचे भिवंडी अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी केला. मनुष्यबळ कमी असल्याचा बहाणा करून हे अधिकारी आपली जबाबदारी झटकतात, असे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून हे कामगार बोनसपासून वंचित राहत असल्याने यंदाही त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.
साडेतीन लाखांहून अधिक कामगारांचा प्रश्न
भिवंडी व परिसरात सुमारे सहा ते सात लाख यंत्रमाग आहे. त्यावर साडेतीन लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. सरकार दरबारी यंत्रमागांचे नियमित नोंदणी न झाल्याने आणि कामगारांना कल्याणकारी योजनेत समाविष्ट न केल्याने त्यांचा हक्क हिरावला आहे. मागील काळात या क्षेत्रातील कामगार बहुतांश अशिक्षित होते; मात्र आज अनेक जण सुशिक्षित आहेत. आपल्या हक्कांसाठी संघटनांमार्फत लढा देताना दिसतात. तरीही सरकार आणि उद्योगमालकांच्या उदासीनतेमुळे त्यांची परिस्थिती जसेच्या तशी आहे.
यंत्रमाग उद्योगाच्या भवितव्याबाबत चिंता
पूर्वी देशाच्या विविध भागांतून आलेले हजारो बेरोजगार कामगार भिवंडीच्या यंत्रमाग उद्योगात कार्यरत होते. मात्र, आता नव्या पिढीला या क्षेत्रात भविष्य दिसत नसल्याने कामगारांची संख्या घटत आहे. परिणामी, भविष्यात भिवंडीची “यंत्रमाग नगरी” म्हणून ओळख लुप्त होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
भिवंडीतील सर्व यंत्रमाग सरकारकडे फॅक्टरी कायद्यानुसार नोंदविणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच ‘यंत्रमाग कामगार कल्याण महामंडळ’ स्थापन करून कामगारांचे भविष्य सुरक्षित करावे. कोरोनाकाळात ज्याप्रमाणे कामगारांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले, त्याप्रमाणे सरकारने या मागण्यांची सातत्याने अंमलबजावणी केली, तर कामगार आणि यंत्रमाग व्यवसाय दोघांचेही भविष्य उज्ज्वल होईल
- सुनील चव्हाण, भिवंडी अध्यक्ष, लाल बावटा सिटू कामगार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.