सणासुदीच्या सुट्यांतही सफाई योद्धे कामावर

सणासुदीच्या सुट्यांतही सफाई योद्धे कामावर

Published on

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : दिवाळी सुट्यांदरम्यानही उल्हासनगर शहरात स्वच्छतेचे काम सुरूच राहणार आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार स्वच्छतेसाठी सज्ज झालेली उल्हासनगर महापालिका शहरात आनंदाचा सण साजरा होईल; पण अस्वच्छतेचा त्रास होऊ देणार नाही. विशेष आदेशानुसार दिवाळीच्या गर्दीतही सफाई मोहीम थांबणार नाही, तर स्वच्छ उल्हासनगरचा मंत्र कायम राहणार आहे.
दिवाळीच्या उत्साहातही शहराची स्वच्छता अबाधित राहावी, यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त (१) डॉ. किशोर गवस यांनी कार्यालयीन आदेश जारी करत सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्यांना सणाच्या काळातही कामावर उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सलग चार दिवस सार्वजनिक सुट्या असल्याने शहरात कचरा साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २० व २२ ऑक्टोबरला सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत सर्व सफाई कर्मचारी शहरातील दैनंदिन सफाई व कचरा व्यवस्थापनाचे कार्य पार पाडतील. या आदेशाच्या प्रती सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, उपआयुक्त (आरोग्य), सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, मुख्य बाजार निरीक्षक आणि मुख्य स्वच्छता निरीक्षकांना पाठविल्या आहेत. त्यावर काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


पर्यायी रजेची सोय
सणासुदीच्या काळातही शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी काम केलेल्या दिवशी त्यांना पर्यायी रजेची सोय करण्यात येईल. आदेशानुसार त्या कर्मचाऱ्यांना इतर दिवशी अर्धा दिवसाची रजा देण्यात यावी, असे निर्देश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहेत, असे पालिकेने स्पष्ट केले.

आरोग्य विभागही सज्ज
शहरात दिवाळीच्या काळात नागरिकांच्या वाढत्या हालचालींमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढते; तसेच बाजारपेठा आणि निवासी भागात घाण साचण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने पूर्ण सज्जता दाखवली आहे. सर्व स्वच्छता निरीक्षक, सफाई मुकादम आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात स्वच्छता कायम ठेवण्यासाठी आदेशित केले आहे.


दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि स्वच्छतेचा सण आहे. शहरात आनंदोत्सव साजरा होईलच; पण त्यासोबत स्वच्छतेचा दिवाही अखंड पेटता राहायला हवा. प्रशासन, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिक सर्वांनी मिळून शहर स्वच्छ ठेवले तरच खरी दिवाळी उजळेल. आपल्या कर्मचाऱ्यांनी सणासुदीतही कामाची जबाबदारी निभावण्याचा निर्णय घेतला आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या योगदानामुळे उल्हासनगर ‘स्वच्छता आणि संस्कृती’ या दोन्हीचा आदर्श ठरेल, असा विश्वास आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com