परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ

Published on

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ
भातकापणी करत असतानाच पावसाची हजेरी; दक्षिण रायगडमध्ये सर्वाधिक नुकसान
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २१ : ऐन दिवाळीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे भातकापणी करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी कापणी केलेला भात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पूर्ण खरीप हंगामात विविध संकटाना सामोरे जात येथील शेतकऱ्यांनी भातशेती पिकवली होती. मोठ्या कष्टाने पिकवलेले धान्य घरात आणण्याच्या शेवटच्या क्षणालाही पावसाने धांदल उडवल्याने शेतकरी चिंतातूर झाला. पावसाचा कोणताच अंदाज नसताना मंगळवारी दुपारनंतर पावसाने रंग दाखवण्यास सुरुवात केली. पोलादपूर, महाडपासून सुरू झालेल्या पावसाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्हा व्यापला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाने कापलेला भात सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यास संधीच दिली नाही. सध्या कापणीचा हंगाम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी पीक घरात आणण्याच्या उद्देशाने भातकापणीला सुरुवात केली होती, मात्र जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
---...........
कापलेल्या भाताचे नुकसान
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कापणी करून शेतात ठेवलेल्या भाताला बसला आहे. पावसामुळे भाताचे भारे पूर्णपणे भिजून गेले आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे उभे पीकही आडवे होऊन पाण्यात भिजले आहे. भिजलेल्या भाताला आता कोंब फुटण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच, भात भिजल्यामुळे जनावरांसाठीचा महत्त्वाचा चारा असलेला पेंढा (गवत)देखील वाया जाणार आहे, ज्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
................
जिल्ह्यातील कर्जत, पेण, खालापूर, अलिबाग, रोहा, सुधागड, महाड यासह बहुतेक तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची आणि योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी कळकळीची विनंती शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये असलेले अधिकारी परतल्यानंतर पंचनामे करण्याची कार्यवाही होईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com