वादळी पावसात ट्रान्सफॉर्मर जळाले
उल्हासनगर, ता. २३ (बातमीदार) : शहराला मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा तडाखा बसला. विजेच्या कडकडाटात जवळपास साडेतीन तास पाऊस कोसळत होता. या काळात अनेक भागांत ट्रान्स्फॉर्मर जळाले, कंडक्टर तुटले आणि वाहिन्या कोसळल्या. संपूर्ण शहर काही काळ अंधारात बुडाले असतानाच, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला.
यंदा पावसाळा लांबल्याने शहरात अधूनमधून पाऊस होत आहे. मंगळवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने विक्रमी जोर पकडला. सायंकाळपासून रात्री साडेनऊपर्यंत ढगफुटीसदृश पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे, वाहिन्या आणि खांब कोसळले. महावितरणने सुरक्षेच्या दृष्टीने काही भागांतील वीजपुरवठा तातडीने बंद केला. बाजारपेठांमध्ये गोंधळ उडाला. नागरिक आणि व्यापारी पावसापासून बचावासाठी आडोशाला धावले; अनेक दुकानांतील वस्तू भिजून नुकसान झाले.
वादळाच्या तडाख्यात लालचक्की, गायकवाड पाडा आणि आनंदनगर येथील ट्रान्स्फॉर्मर जळाले. गायकवाड पाड्यातील हायटेंशन खांब कोसळला, तर दोन ते तीन ठिकाणी कंडक्टर तुटले. कानसई परिसरात वायरी कोसळल्याने संपूर्ण भाग अंधारात गेला. सुभाष टेकडी आणि वखार परिसरातील शेखर गुजर यांच्या गिरणीजवळील वाहिन्यांचे घसरण झाल्याने सतत स्पार्किंग होत होते. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
वादळ शांत होताच कार्यकारी अभियंता प्रवीण चाकोले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यादव इंगळे, विलास कुंभारे, जितेंद्र प्रजापती आणि त्यांच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पावसाच्या अवकाळातच रात्रभर करून सर्व यंत्रणा दुरुस्त करण्यास सुरुवात केली. ओलेचिंब अवस्थेत विजेच्या धोक्यातही या पथकाने ट्रान्स्फॉर्मर बदलणे, तुटलेल्या कंडक्टर जोडणे, खांब उभे करणे अशी अनेक कामे करून वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यांच्या या तातडीच्या प्रतिसादामुळे नागरिकांनी ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
सकाळीही पाहणी
रात्री उशिरापर्यंत केलेल्या प्रयत्नांनंतरही महावितरणचे अधिकारी सकाळी पुन्हा सर्व ठिकाणांची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले. कोठेही पुन्हा त्रुटी निर्माण होऊ नयेत म्हणून सर्व जोडणी तपासण्यात आल्या. या संपूर्ण कारवाईत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, जबाबदारी आणि समर्पणभावना नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरली. वादळाने शहर हादरले असले तरी, महावितरणच्या ‘रात्रपाळी योद्ध्यांमुळे’ उल्हासनगर पुन्हा उजळले.
उल्हासनगर : पावसामुळे वीज खंडित झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.