उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर?

उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर?

Published on

अंबरनाथ, ता. २३ (वार्ताहर) : शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने आरोग्य यंत्रणेला हादरा दिला आहे. स्वामी नगर येथील ५८ वर्षीय मीनाबाई सूर्यवंशी यांना वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्याच वेळी छाया उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी वापरली जात होती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मीनाबाई यांची प्रकृती रविवारी रात्री अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी तातडीने छाया उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे निदान झाले. ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने त्यांना तातडीने उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल किंवा मुंबईतील मोठ्या रुग्णालयात हलवण्याची शिफारस करण्यात आली. डॉक्टरांनी रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले; मात्र कर्मचाऱ्यांनी ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या व्हीआयपी ताफ्यात दिल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णालयाकडे त्या वेळी कोणतीही वाहनव्यवस्था नव्हती. स्थानिक रहिवासी केशवन यांनी सांगितले, मीनाबाईंची अवस्था अत्यंत गंभीर होती. आम्ही रुग्णवाहिका मागितली; पण ती उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते महेश इनकर यांनीही हा आरोप पुष्टीसह मांडला.

पर्यायी वाहनासाठी वेळ वाया
रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाईक आणि रहिवाशांनी पर्यायी खासगी वाहन शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही मिनिटांतच मीनाबाईंची प्रकृती अधिक बिघडली. अखेर रुग्णालयातून हलवण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. महेश इनकर म्हणाले, जर वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती, तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

रुग्णालय प्रशासनाचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर ड्युटीवर असलेले डॉ. सुनील घाटकर यांनी सांगितले, रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होता. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. पुढील उपचारासाठी त्यांना हलवण्याचा सल्ला दिला होता. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने उशीर झाला; मात्र आमच्याकडून निष्काळजीपणा झाला नाही. छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शुभांगी वाडेकर यांनी सांगितले, ही घटना आमच्या निदर्शनास आली आहे. याची सखोल चौकशी सुरू असून, जर कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

नागरिकांकडून चौकशीची मागणी
घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे.
त्यांनी विचारले आहे की, कोणाच्या आदेशावरून सरकारी रुग्णवाहिका व्हीआयपी सेवेकरिता वापरली गेली? या प्रकरणात दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आरोग्यसेवेतील ‘व्हीआयपी संस्कृती’वर प्रश्नचिन्ह
घटनेने पुन्हा एकदा ‘व्हीआयपी संस्कृती’मुळे सामान्य जनतेचा जीव धोक्यात येतो का? हा प्रश्न उपस्थित केला आहे. गरीब, गरजू रुग्णांसाठी असलेली सरकारी सेवा जर व्हीआयपी कार्यक्रमांसाठी वळवली जात असेल, तर त्यावर कठोर नियंत्रणाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com