नैसर्गिक तलावात छटपूजा
वसई, ता. २५ (बातमीदार) : जलप्रदूषण होऊ नये म्हणून सणासुदीच्या काळात तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी न्यायालयाने निर्देश दिले आहेत. उत्तर भारतीय समाज सोमवारी (ता. २७) छटपूजा साजरी करणार असून, तलावाच्या ठिकाणी पूजेचे आयोजन करू द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. महापालिकेने जलप्रदूषण होऊ नये म्हणून कृत्रिम तलाव उभारले आहेत. तसेच नैसर्गिक तलावात जलप्रदूषण न करता पूजा करण्यासदेखील स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सव काळात मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, म्हणून महापालिकेने आदेश जाहीर करीत कृत्रिम तलावाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. नैसर्गिक तलावात विसर्जनाला बंदी केली होती. आता छटपूजा उत्सव तलावात साजरा केला जाऊ नये, असे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केले; मात्र यावरून राजकारण तापले आहे. यासाठी तलावाच्या ठिकाणी पूजेला परवानगी द्यावी, प्रदूषण होणार नाही, अशी भूमिका काही पक्षांनी घेतली. त्यानंतर प्रशासनाने अटी ठेवत परवानगी दिली आहे.
छटपूजा उत्सव तलावाच्या ठिकाणी साजरा करता यावा, यासाठी उत्तर भारतीय समाजातील नागरिक मोठ्या संख्येने माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या भेटीला गेले. प्रशासनाकडे मागणी करू, असे त्यांना आश्वासित केले होते. त्यानुसार पाठपुरावा सुरू केला गेला, तर महापालिका प्रशासनाचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी त्वरित विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला उत्सव साजरा करण्यासंदर्भात सूचना केल्या आणि उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले.
प्रभाग समितीनिहाय विविध ठिकाणी ३२ कृत्रिम तलाव तयार करण्यात येत असून, समुद्रकिनाऱ्यांवरदेखील महापालिकेमार्फत व्यवस्था करण्यात येत आहे. या वेळी शिवसेनेचे आमदार विलास तरे यांनी बैठकीला हजेरी लावली होती. आमदार स्नेहा दुबे, राजन नाईक यांनीदेखील छटपूजा उत्सवाबाबत प्रशासनाला पत्र दिले.
प्रशासनाकडून विविध व्यवस्था
कृत्रिम तलावांच्या ठिकाणी निर्माल्य कलश, विद्युत व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, सर्व सुरक्षा व्यवस्था आणि इतर सुविधा असणार आहेत. समुद्रकिनारी सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षक, अग्निशमन विभागाच्या बोटी तैनात असणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
नैसर्गिक तलावात अर्ध्य देण्याची परवानगी
छटपूजा साजरी करताना नैसर्गिक तलावांमध्ये भाविकांनी कोणत्याही प्रकारचे पूजा सामुग्री व निर्माल्य विसर्जित करू नये. तलावात कुठलेही निर्माल्य, तेलाचे दिवे सोडता येणार नाहीत, या अटींवर भाविकांना फक्त अर्ध्य देण्यासाठी नैसर्गिक तलावांमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर भारतीयांमधील समाजाच्या श्रद्धेचा एक भाग म्हणून छटपूजा उत्सव दरवर्षी गुण्यागोविंदाने साजरा होतो. त्याला राजकारण कधी आड आले नाही. तलावात पूजेसाठी परवानगी मिळावी, यासाठी प्रशासनाला माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रव्यवहार केला. जलप्रदूषण होऊ नये या अटीवर पालिकेने परवानगी दिली.
- रमाशंकर मिश्रा, बहुजन विकास आघाडी
शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी त्याला प्रतिसाद दिला. आता छटपूजा उत्सवही पर्यावरणपूरक पद्धतीने व उत्साहात साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न आहेत.
- मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

