मुंबई
अपहारप्रकरणी आशागड सरपंचाला अटक
कासा, ता. १ (बातमीदार) ः मुंबई-बडोदा महामार्गालगतच्या जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आशागड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश धोडी यांना डहाणू पोलिसांनी अटक केली आहे. शुक्री लक्ष्या रावते या वृद्ध महिलेच्या नावावरील जमिनीच्या मोबदल्यातील ८५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकाश धोडी हे गेल्या एक वर्षापासून फरार होते. पोलिसांच्या सततच्या तपास, गुप्त माहिती आणि शोधमोहिमेद्वारे अखेर त्यांना अटक करण्यात यश आले. अटकेनंतर त्यांना उच्च न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांचा जामीन अर्ज फेटाळून तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, जमिनीच्या व्यवहारात इतर कोणाचा सहभाग होता का, याची चौकशी केली जात आहे.

