डिजिटल युगात हरवली दिवाळीची ऊब

डिजिटल युगात हरवली दिवाळीची ऊब

Published on

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ३ : कधी काळी दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागली की, प्रत्येकाच्या दारात पोस्टमनचा ठोका आणि त्याच्या हातात रंगीत लिफाफ्यांत गुंफलेल्या सुंदर शुभेच्छापत्रांचे ढीग असायचे. ‘प्रिय मित्रा, तुला आणि तुझ्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा...’ असे काही शब्द वाचतानाच मनात आनंदाची लहर उमटायची. ही शुभेच्छापत्रे म्हणजे केवळ कागदाचे तुकडे नव्हते, तर त्या काळातील नात्यांमधील स्नेह, जिव्हाळा आणि भावनांचा सुगंध होता.
दिवाळीच्या काही दिवस आधीच दुकाने रंगीबेरंगी शुभेच्छापत्रांनी फुललेली असायची. मित्र-मैत्रिणी, विद्यार्थी, कुटुंबीय सर्वजण एकमेकांना देण्यासाठी आकर्षक कार्ड निवडण्यात गुंग असायचे. मनापासून लिहिलेल्या शुभेच्छा, छोटासा फोटो, सुगंधी कागद, सुंदर अक्षरे या सगळ्यांतून एक जिव्हाळ्याचे नाते व्यक्त होत असे. हृदयाला व मनाला स्पर्श करणारे संदेश असणारे शुभेच्छापत्र खरेदीसाठी झुंबड उडालेली असायची; मात्र आजच्या डिजिटल युगात ती परंपरा हळूहळू इतिहास जमा होऊ लागली आहे. शुभेच्छा फोटोसह आलेले डिजिटल कार्ड आणि काही सेकंदात शेकडो लोकांना पोहोचणारे संदेश हेच आजचे वास्तव झाले आहे. हा संदेश फक्त स्क्रीनवरच्या अक्षरांपुरत्याच राहतात. भावनांचा उबदारपणा, हस्ताक्षराचा गंध आणि नात्यांचा जिव्हाळा सगळे कुठेतरी हरवले आहे. तंत्रज्ञान युगात वेग आला असला तरी आपुलकीचा स्पर्श मात्र हरवला आहे.

भावनाशून्य काळ
शुभेच्छा पत्रांचा लिफाफा उघडताना येणारा सुगंध, सुंदर अक्षरात लिहिलेले नाव, कधी-कधी आत ठेवलेला छोटासा फोटो या सर्व आठवणींना आज समाजमाध्यमाने डिजिटल धक्का दिला. डिजिटल युगात शुभेच्छा काही सेकंदात व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इन्स्टाग्राम स्टोरी किंवा फॉरवर्ड मेसेजमधून येतात. तंत्रज्ञानाने संवाद सोपा केला; मात्र भावना दूर गेल्या आहेत, हेच या काळाचे वास्तव आहे.

आत्मियतेचा सुगंध
आजही काही जण शुभेच्छापत्रांचा वापर करतात. दिवाळीत मित्र, नातेवाईक, कार्यालयातील सहकाऱ्यांकडून आलेले शुभेच्छापत्र एक प्रकारे नाते घट्ट करते. यातून हरवलेली आत्मियता पुन्हा परत आणते. एक मात्र खरे मोबाईलमधील मेसेज डिलिट होतो; पण पत्रातील भावना कधीच नष्ट होत नाही, हे मान्यच करावे लागते.

पोस्टाने दिवाळी फराळ थेट परदेशात
पोस्ट कार्यालयातील कर्मचारी सांगतात, एकेकाळी दिवाळीच्या काळात हजारो शुभेच्छापत्रांची देवाणघेवाण व्हायची; मात्र आता ही भेटकार्ड पाहायला मिळत नाहीत. पोस्टाने दिवाळी फराळ थेट परदेशात पाठविण्याची सुविधा उपलब्ध केली होती. त्याचा उपयोग काही जणांनी केला; परंतु भेटकार्डांऐवजी समाजमाध्यमातूनच अनेकांनी दिवाळी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com