कांदिवलीतील आकुर्ली मार्ग धोकादायक
कांदिवलीतील आकुर्ली मार्ग धोकादायक
समस्यांमुळे वाहनचालकांसह प्रवासी हैराण
कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेतील आकुर्ली या मुख्य मार्गावरील खड्डे, असमतोल रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. अपघातांमध्ये वाढ झाल्याने खड्डे बुजवून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. कांदिवली पूर्व स्थानकापासून ते द्रुतगती मार्ग, हनुमाननगर, लोखंडवाला आणि दामूनगरच्या राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगराळ भागापर्यंत हा मार्ग जातो. या मुख्य मार्गात अनेक ठिकाणी खोदकाम केले गेले आहे. खड्डे बुजवलेल्या मार्गात समानता नाही. द्रुतगती मार्गाखालील रस्त्यावर खड्डे आणि उंचसखलपणा आहे. काही ठिकाणी तकलादू काम केल्याने मार्ग खडबडीत झाला आहे.
काही ठिकाणी काँक्रीटीकरण मार्गातील खड्डे डांबर टाकून बुजविले असल्याने उंचवटे निर्माण झाले आहेत. आकुर्ली मार्गावर द्रुतगती भुयारी मार्गात रस्त्याची विचित्र अवस्था आहे. अशोक चक्रवर्ती तसेच अशोकनगर मुख्य मार्गावरदेखील चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजवण्यात आले आहेत.
लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात येतील, अशी प्रतिक्रिया रस्ते विभागातील दुय्यम अभियंता राहुल पवार यांनी दिली.

