आताचा समाज श्रावणबाळाची महती विसरला : उच्च न्यायालय
आताचा समाज श्रावणबाळाची महती विसरला : उच्च न्यायालय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पालकांकडून मुलांच्या संगोपनात काहीतरी चुका होत असाव्यात, आताचा समाज श्रावणबाळाची महती विसरला आहे, म्हणूनच कदाचित मुले पालकांना तीर्थयात्रेला न नेता न्यायालयात खेचतात, अशी खंत नुकतीच उच्च न्यायालयाने बोलून दाखवली. एका मुलाने वृद्ध पालकांना न्यायालयात खेचले असून, त्याच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
उपचारासाठी पालकांना मुंबईत यायचे असून, त्यांना मुंबईतील आपल्या घरी राहायचे आहे. तथापि, त्यांना मुंबईतील आपल्या घरात येण्यापासून मज्जाव करण्याची मागणी याचिकाकर्त्या मुलाने केली होती. तथापि, न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने त्याची मागणी मान्य करण्यास नकार दिला. मुंबईतील एका दिवाणी न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये याचिकाकर्त्याच्या पालकांच्या बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयाला याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने याप्रकरणी आदेश देताना मुलांकडून पालकांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीबाबत संताप व्यक्त केला. ही आणखी एक घटना आणि दुःखद परिस्थिती असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. याचिकाकर्त्याने आजारी आणि वृद्ध पालकांची काळजी घेण्याचे नैतिक कर्तव्य बजावण्याऐवजी त्यांना त्यांच्या घरात येण्यापासून रोखण्याची मागणी केल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली. भारतीय संस्कृतीत रुजवलेल्या नैतिक मूल्यांत झालेली घसरण यातून प्रतीत होत असल्याचे नमूद करताना पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या आणि वाटेत आपले जीवन अर्पण करणाऱ्या श्रावणबाळाला आपण विसरलो आहोत, असे न्यायालयाने म्हटले.
..
न्यायालायाचा इशारा
याचिकाकर्त्याचे पालक सध्या त्यांच्या तिसऱ्या मुलाकडे कोल्हापुरात आहेत, परंतु त्यांना उपचारांसाठी वारंवार जे. जे. रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे पालक उपचारांसाठी मुंबईत येतील. याचिकाकर्ता किंवा त्याच्या पत्नीने त्यांना आपल्या घरी आणावे आणि उपचारांसाठी त्यांच्यासह रुग्णालयात जावे, आदेशाचे उल्लंघन झाले किंवा पालकांची कोणतीही गैरसोय झाली, तर याचिकाकर्त्याला अवमानप्रकरणी दोषी ठरवून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

