प्राध्यापक भरतीचा तिढा सुटणार, लवकरच सुधारीत आदेश

प्राध्यापक भरतीचा तिढा सुटणार, लवकरच सुधारीत आदेश
Published on

प्राध्यापक भरतीचा तिढा सुटणार!
लवकरच सुधारित आदेश; मागण्यांवर सरकार सकारात्मक
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या प्राध्यापक भरतीसाठी ६ ऑक्टोबरला जारी केलेल्या आदेशातील जाचक-अटी लवकरच शिथिल केल्या जाणार आहेत. त्यासाठीचा सुधारित आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून पुढील दोन दिवसांत जारी केला जाणार असल्याने काही महिन्यांपासून रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्राध्यापक भरतीतील विविध अटींमुळे राज्यातील बहुतांश उमेदवार पात्र ठरू शकणार नव्हते. या भरतीचा पेच सोडवण्यासाठी कुलपती तथा राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही पुढाकार घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी राज्यातील कुलगुरूंनी केली होती. दोन दिवसांपूर्वीच याबाबत मुंबईत बैठकही पार पडली. त्यात सर्व मागण्या आणि अडचणींचा आढावा घेऊन प्राध्यापक भरतीच्या आदेशात सुधारणा केली जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी नुकतीच राज्यातील कुलगुरूंची बैठक घेतली. याशिवाय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतही कुलगुरूंची बैठक पार पडली. या बैठकांमध्ये विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रखडलेल्या भरतीवर सविस्तर चर्चा झाली. प्राध्यापकांच्या रिक्त जागांमुळे विद्यापीठांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींची माहिती काही कुलगुरूंनी कुलपतींना दिली. ६ ऑक्टोबरच्या आदेशात संशोधन लेखांसह इतर अटींमुळे विद्यापीठांना रिक्त पदे भरताना अडचणी येत होत्या. गेल्या वर्षीच्या आदेशानुसार भरती प्रक्रिया झाल्यास मार्ग निघू शकेल, असेही कुलपतींच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर सरकारने प्राध्यापक भरतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याने या भरतीचा सुधारित आदेश जारी केला जाणार आहे.
------
गुणांकनात बदल होण्याची शक्यता
प्राध्यापक भरतीसाठी २७ फेब्रुवारीच्या आदेशात शैक्षणिक पात्रता आणि अनुभवासाठी ८० गुण, तर मुलाखतीसाठी २० गुण होते. अनेक विद्यापीठांनी ही प्रक्रिया थांबवली. त्यामुळे ६ ऑक्टोबरच्या आदेशात बदल करून शैक्षणिक पात्रतेला ७५ गुण आणि मुलाखतीला २५ गुण करण्यात आले. या नवीन गुणांकन पद्धतीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंध आणि राज्यातील विद्यापीठांच्या पदवीला कमी गुण इत्यादी जाचक अटी ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलपतींकडून या गुणांकन पद्धतीत तसेच जाचक अटींमध्ये येत्या काळात बदल केले जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com