कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे अस्तित्व धोक्यात!
कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे अस्तित्व धोक्यात
हजारो शाळांना टाळे लागण्याची भीती
नवीन संच मान्यतेमुळे दुर्गम भागातील विद्यार्थी होणार शाळाबाह्य; शिक्षण क्रांती संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कळवा, ता. २४ (बातमीदार) : सरकारने निश्चित केलेले संच मान्यतेचे नवीन निकष कायम ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो शाळा शिक्षकांविना बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे खेडोपाड्यातील आणि दुर्गम भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील, असा गंभीर इशारा शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी सरकारला दिला आहे.
आरटीई कायद्याचा आधार घेत सरकारने पहिली ते बारवीपर्यंतच्या वर्गांसाठी संच मान्यतेचे नवीन निकष निश्चित केले. यामुळे राज्यातील अनेक शाळा शिक्षकांविना बंद पडणार असून, दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जातील, असा धोका सुधीर घागस यांनी व्यक्त केला आहे. शिक्षण संचालकांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत २० नोव्हेंबरला पत्र काढून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ५ डिसेंबरपर्यंत जिल्हास्तरावर व १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत विभाग स्तरावर पूर्ण करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. या तत्परतेमुळे राज्यभर शिक्षक समायोजनाचा गोंधळ तर उडणार आहेच, परंतु विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोर्ड परीक्षांच्या तोंडावर सरकारची तत्परता राज्याला शिक्षणाच्या दृष्टीने मागे घेऊन जाणारी ठरणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून समायोजन प्रक्रिया थांबवावी, अशी विनंती घागस यांनी केली आहे.
१६५ शाळा बंद पडणार
या संच मान्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात १६५ शाळा बंद पडणार असून, एक हजार ९९२ विद्यार्थ्यांना घरापासून दूर शिक्षणासाठी जावे लागणार आहे. राज्यातील अशा अनेक शाळा बंद पडणार असून, भविष्यात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पूर्वीप्रमाणेच वणवण करावी लागणार असल्याची प्रतिक्रिया सुधीर घागस यांनी दिली. यामुळे आरटीई कायद्यात सुधारणा करून विद्यार्थ्यांना आपल्या नजीकच्या शाळेत शिकता यावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सुधीर घागस यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

