कल्याण डोंबिवली मध्ये हवेतील प्रदुषण वाढले...
हवा प्रदूषण धोक्याच्या पातळीवर
कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासन जागे होणार कधी?
दत्तात्रय बाठे ः सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ७ ः कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात हवा प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत असून, येथील हवेचा दर्जा (एक्यूआय) ‘अस्वास्थ्यकर’ श्रेणीत पोहोचला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, श्वसनाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ प्रभावी उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता पर्यावरण जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहराच्या वाढत्या शहरीकरणामुळे बांधकामे आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दिवाळी सणानंतर हवेची पातळी खालावली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वाढत्या हवा प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची प्रभावी अंमलबजावणी पालिका प्रशासनाने केली पाहिजे, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरत आहे.
हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी यंत्रणा
कल्याण-डोंबिवली क्षेत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील गुणवत्ता मोजण्यासाठी एअर क्वालिटी मॉनिटरिंग मशीन खडकपाडा ‘ब’ प्रभाग क्षेत्र कार्यालय आणि डोंबिवलीतील मानपाड्यातील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे बसविल्या आहेत. या मशीनद्वारे हवेची गुणवत्ता समजली जाते.
प्रदूषणाची प्रमुख कारणे
वाढते शहरीकरण
जुन्या इमारतींचे पुनर्बांधणी व पाडकाम
वाढती वाहनांची संख्या
सुरू असलेली पायाभूत कामे
हवेची स्थिती गंभीर
१ नोव्हेंबर : एक्यूआय - ४१ (चांगला)
१० नोव्हेंबर : एक्यूआय - २१२ (अस्वास्थ्यकर)
३० नोव्हेंबर : एक्यूआय - १४५
४ डिसेंबर : एक्यूआय - १३६ (अस्वास्थ्यकर)
नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक धोका आहे. शहरात घरातील जागेची कमतरता आणि स्वयंपाकघरातील राबता यामुळे हैराण असताना बाहेरदेखील हवेतील प्रदूषणाने श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे गृहिणी संगीता मोरे यांनी म्हटले आहे.
प्रशासनाकडून ‘मोजके’ उपाय
जनजागृती आणि कारवाई : पालिकेने पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारत कल्याणमधील एका आरएमसी प्लांटवर बंदी घातली आहे.
धुळीवर नियंत्रण : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आयोजनाखाली वाहन विभागाचे अधिकारी प्रवीण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य रस्त्यांवर धुळीचे शमन करण्यासाठी रात्रीच्या वेळेस चार पॉवर स्वीपर मशीन कार्यरत आहेत.
प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी त्या अपुऱ्या असल्याचे मत व्यक्त होत आहे.
‘ही’ घ्या काळजी
हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी. तसेच बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. जेणेकरून धुळीपासून होणारी ॲलर्जी टाळता येईल. सर्दी पडसे, त्वचा ॲलर्जी झाल्यास दुर्लक्ष न करता वेळीच औषधोपचार करणे गरजेचे आहे. लहान मुलांची काळजी घ्यावी. घरातील धूळ वेळीच्या वेळीस ओल्या कपड्याने स्वच्छ करावी, घरातील गॅलरीत परसदारात छोटेखानी झाडे लावावीत, जेणेकरून हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली पाटील यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

