ठाण्यात पुढील तीन दिवस पाणीटंचाई
ठाण्यात पुढील तीन दिवस पाणीटंचाई
३० टक्के कपातीचा निर्णय; अनेक भागांचा पुरवठा विस्कळित
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : पिसे बंधाऱ्यातून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे येणारी मुख्य जलवाहिनी तुटल्यामुळे ठाणे शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. शनिवारी (ता. ६) सकाळी कल्याण फाटा परिसरातील महानगर गॅसच्या कामादरम्यान एक हजार मिमी व्यासाच्या या जलवाहिनीला मोठी हानी पोहोचली. या जलवाहिनीची दुरुस्ती सुरू असली तरी ती जुनी व प्रीस्ट्रेस काँक्रीटची असल्याने काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात तीन दिवस ३० टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे.
ठाणे शहराची सुमारे २७ लाख लोकसंख्या असून, दररोज ६२१ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे, मात्र प्रत्यक्षात फक्त ५८५ दशलक्ष लिटर पाणीच उपलब्ध होते. लोकसंख्या वाढ आणि नवीन वसाहतींमुळे पाण्याची समस्या कायम असून, वाढीव पाणी मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
महापालिकेने कळवा, मुंब्रा, घोडबंदर आणि ठाणे शहरात ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेने पुढील काही दिवस झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान, एमआयडीसीकडून पाणी घेणाऱ्या दिवा भागातही पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अनियमित आणि कमी प्रमाणात पाणी मिळू शकते. महापालिकेने सर्व नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
‘या’ भागांमध्ये पाणीकपात?
किसननगर १ व २
वागळे इस्टेट
इंदिरानगर
कोपरी
गावदेवी
बाळकूम
घोडबंदरचा काही परिसर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

